पान:निर्माणपर्व.pdf/172

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 या निरोपाच्या अग्रलेखात मी नेहमीचा 'माणूस' बंद झाला तरी दोन विशेषांक वाचकांच्या हाती देण्याची योजना मांडली होती. एक मानवेन्द्रनाथ रॉय अंक व दुसरा पं. दीनदयाल उपाध्याय अंक. दोन थोर मानवतावादी विचारवंत. एक साम्यवादाकडून मानवतावादाकडे आलेला. दुसरा राष्ट्रवादातून मानवतावादात उत्क्रांत झालेला. 'माणूस' वर या दोघा विचारवंतांचे काही ऋण होते. या ऋणातून मुक्त होण्याची कल्पना या अंकामागे होती.
 पण कोणाचा तरी मदतीचा, सहानुभतीचा स्पर्श लाभे आणि 'शेवटचा अंक’ पुढे पुढे ढकलला जाई. 'निरोपाचा अग्रलेख' २-४ आठवडे तसाच टेबलावर लोळत पडला होता. एकदा तर 'छापून टाका' असे सांगून मी सहसंपादक दिलीप माजगावकरांच्या तो हवाली करून मुंबईला रॉय अंकाच्या तयारीसाठी निघूनही गेलो होतो.
 परत येऊन पाहतो तो सहसंपादकांनी तो टेबलाच्या खणात ठेवून दिलेला दिसला!
 

 स्वतंत्र विचारांची चारी दिशांनी कोंडी झालेल्या वातावरणात रॉय अंक निघाला म्हणून त्याचे खूप स्वागत झाले. प्रसिद्ध विधायक कार्येकर्ते आबा करमरकर एक दिवस सकाळी घरी आले आणि 'Manoos has done a yeoman service' असा या अंकावरचा अभिप्राय त्यांनी दिला. त्यांना या अंकावर, त्यातील विचारांवर एक स्वतंत्र लेख लिहायचा होता. मुंबईहून ‘टॉलस्टॉय' लेखिका सौ. सुमती देवस्थळे यांनी फोन करून अंकाचे स्वागत केले. एवढ्या गंभीर प्रकृतीचा अंक पण प्रती कमी पडल्या. सर्वसामान्य वाचकांनाही यातील स्वतंत्र विचारांची एवढी ओढ त्या बंदिस्त काळात जाणवत होती, हा याचा अर्थ. तुरुंगात अंकावर चर्चासत्रे झाली. महाराष्ट्रातील अग्रेसर विचारवंतांनी रॉय यांच्या माध्यमातून स्वातंत्र्य, लोकशाही या कल्पनांचा केलेला पुरस्कार अंकाच्या पानापानांतून उमटलेला होता. अगदी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा या अंकातील लेखही याला अपवाद नव्हता.

 रॉय अंकाव्यतिरिक्त 'सोल्झेनित्सिन' च्या ‘फर्स्ट सर्कल' कादंबरीतून निवडून अनुवादित केलेले ५ लेख आणि श्री. पु. ल. इनामदारांची लेखमाला ही या प्रीसेन्सॉरशिप कालखंडातील विशेष उल्लेखनीय प्रसिद्धी होती. सोल्झेनित्सिनने वर्णन केलेला स्टॅलिन काळातील भयग्रस्त रशिया, लाचारीने भरलेले रशियन समाजजीवन यांची अचूक आणि भेदक वर्णने येथील परिस्थितीशी तंतोतंत जुळणारी होती. 'त्याने (स्टॅलिनने) कोणावरही कधीही विश्वास ठेवला नाही' असा एखादा मथळाही परिस्थितीतले साम्य चटकन जुळवून टाकी. मजकूर तपासून आणून असे मथळे नंतर टाकण्याचे स्वातंत्र्य अधूनमधून घेऊ दिले जात होते.

चित्त हवे भयशून्य । १७१