पान:निर्माणपर्व.pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


भारतीय मृगेन्द्र




 निबिडतरकांतारजठरात निद्रिस्त असणारा हरी शेवटी जागा झाला, खवळला आणि त्याने चालून आलेल्या मदांध गजालीश्रेष्ठाचे गंडस्थळ फोडून आपल क्रोध शमवला.
 सिंह हा स्वातंत्र्याचे, स्वाभिमानाचे, माणसांच्या ठिकाणी असणा-या आत्मसन्मान प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून समजला जातो.
 ‘मानमहताम् अग्रेसर : केसरीˈ असे कवींनी त्याचे वर्णन केलेले आहे.
 कठिण काळ आला तर हा राजा, हा मानमहतांचा अग्रेसर उपाशी राहणे पसंत करतो; पण गवत खात नाही.
 याला बळजबरीने गवत खाऊ घालण्याचा प्रयत्न झाला. त्याची विटंबना केली गेली. त्याचे अंतस्थ राजेपण हिरावून घेतले गेले. त्याचा अहंकार डिवचला गेला. संधी मिळताच त्याने मग आपली नखाग्ने बाहेर काढली, गुरुतरशिलांचे भेद केले आणि भ्रमाने उन्मत्त बनलेल्या अनेक गजश्रेष्ठांना त्याने अक्षरशः धुळीत लोळवले.
 प्रत्येकाचा अभिमान पायदळी तुडवला गेलेला होता.
 राजकर्त्यानी गेल्या दीड-दोन वर्षात सामान्य माणसाची प्रतिष्ठाच नष्ट करून टाकली होती.
 मग तो सामान्य माणूस शहरातला कारकून, कलावंत असो, नाहीतर खेड्यातला लहान, मोठा शेतकरी असो.
 समाजातले सगळेच थर दुखावले गेले होते.
 कुणी सक्तीने नसबंदी झाली म्हणून चिडलेले होते.
 कुणी विनाचौकशी, विनापराध तुरुंगात डांबले गेल्यामुळे संतप्त होते.
 नागरिक स्वातंत्र्याची गळचेपी झाली म्हणून बुद्धिजीवी अस्वस्थ होते.

 आर्थिक कोंडी झाली म्हणून श्रमजीवी चितेत होते.

निर्माणपर्व । १५६