पाहिले पाहिजे. कारण यामुळे लोकशाहीची परंपरा खंडित न होता, सत्तांतराकडे जाता येईल व जनता पक्ष हा खरोखरच लोकशाही मूल्यांची बूज राखणारा पण आहे ही प्रतिमा जनमानसावर कोरली जाईल.
यासाठी अशा निवडक व्यक्तींच्या जागा मोकळ्या ठेवण्याचा निर्णय जनता पक्षाने घेणे सर्वतोपरी उचित ठरेल. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्याविरुध्द उमेदवार उभा करण्याचा अट्टाहास जनता पक्षाने कशासाठी धरावा?
महाराष्ट्राचे सर्वमान्य नेते म्हणून यशवंतरावांचे असलेले स्थान वादातीत आहे. सर्व थरात, सर्व पक्षोपपक्षात त्यांच्याविषयी आपुलकी व आदरभाव आहे, जनताही त्यांना फार मानते. त्यांच्या लोकशाही-समाजवादी प्रवृतीबद्दलही संशयाला जागा नाही. कशासाठी अशा जनतामान्य व्यक्तीला विरोध करायचा? कुठल्याही पक्षातल्या असोत, अशा निवडक व्यक्तींचा अपवाद केला जावा, विशेष सन्मानपूर्वक त्यांना निवडले जावे. यामुळे कर्तृत्वाची, सेवेची बूज राखण्याचे समाजालाही शिक्षण मिळेल आणि राजकीय जीवनाची एकूण उंची वाढण्यासही असे निवडक अपवाद कारणीभूत ठरू शकतील.