पान:निर्माणपर्व.pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देऊ नका. ऐक्याच्या भावनेतच गावाचा विकास आहे. धर्माची सुरुवात याच वृत्तीपासून होते. विकासाचा निश्चित मार्ग ज्ञात नसला म्हणजे विपरित घटना घडतातच. साऱ्या देशात आज हेच चालले आहे. विकास नेमका कशात आहे व तो कसा साधावा, हे अंध:कारमय परिस्थितीतून चाललेल्या माणसांनी ठरविणे घातक आहे. विकास हा मानवी प्रवृत्तीच्या स्नेहमय अवस्थेचा व्हावयाचा असतो. माझे घर-माझे गाव या भावनेत विकासाचे मूळ आहे. जेव्हा त्यातील 'माझा' शब्द विसरला जातो तेव्हा विकास हा राक्षस बनतो. अशा राक्षसाचा विकास आपल्या गावात होऊ देऊ नका.'

 ‘माणसात देव पहाल व त्याच्या आत्म्याला शांत करणारे काम कराल तेव्हाच खरे भजन होणार आहे. मानवामानवात भांडणे ही पशुता आहे. भजनपूजनादी कार्यक्रमांद्वारे ही पशुता नष्ट करावयाची असते. पण आपला पशुपणा राखून भजनपूजन करणारे लोक धार्मिक नव्हेत हे निश्चित समजा. अशा धर्महीन वृत्तीला गावात थारा देऊ नका. आपले गाव स्वर्गतुल्य करण्यासाठी सारे मिळून अहर्निश झटत राहा. गाव स्वच्छ करण्यापूर्वी तुमचे संतान धैर्यशाली करा. गावात देवळे बांधण्यापूर्वी स्त्रियांचे शील-पावित्र्य रक्षण करा. यामुळे प्रत्येक घरच देऊळ बनेल.'

 ‘प्रथम तुम्ही प्रत्येकजण महान् व मंगल होण्यासाठी सावधान असा. द्वेष, सूड, मत्सर व परहानी या दोषांना मूठमाती द्या. मग गावात मंदिरे, विद्यामंदिरे, विद्युद्दीपांचे झोत, नळ या व्यवस्था करा. श्रम, परोपकार, सहिष्णुता, प्रेम व ज्ञान संपादन करण्याची पराकाष्ठा करा. यासाठी कोणताही पक्ष, राजकीय डाव नको. यासाठी हवी आहे निर्मळ माणुसकी.....'

 जुन्या भागवतधर्मवृक्षाला आलेले हे नवे मानवताधर्माचे फळ परिपक्व नाही असे कोण म्हणेल ?

 माणसाने स्वत:ही बदलले पाहिजे–परिस्थितीही बदलवून घेतली पाहिजे, हेच नवा मानवताधर्म सांगतो.

 सुरुवात गावापासून.

 म्हणून तर 'ग्रामायन'चे काही कार्यकर्ते या धार्मिक उत्सवाला-माचणूरच्या मेळाव्याला मुद्दाम पुण्याहून गेलेले होते. हेमलकसा-भमरागडच्या आदिवासी भागात काम करणारा जगदीश गोडबोले म्हणून तर इतक्या लांबवरून येथे येऊन तळ ठोकून बसला होता. वास्तविक तो काही भजनपूजनवाला नाही. पण धर्माचा उपयोग समाजपरिवर्तनासाठी करून घ्यायला हवा असे त्याचे,

निर्माणपर्व । १४४