पान:निर्माणपर्व.pdf/142

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
एक प्रयोग






 श्रीक्षेत्र माचणूर. पंढरपुरापासून वीस-बावीस मैल अंतरावर असलेले ठिकाण. तालुका मंगळवेढा. चोखामेळा आणि दामाजीपंत यांच्या काळापासून दुष्काळासाठी प्रसिद्ध असलेला भाग. सातशे वर्षे उलटली. भक्तीचे मळे जेथे सातत्याने फुलले, तेथे अजूनही दुष्काळाची सतत भीती बाळगत जगावे लागते. चंद्रभागा संथ वाहत असते. कोट्यावधी लोकांची पापे तिने आजवर धुतली असतील. पण आसपासचा मुलुख हिरवा करून सोडावा, येथील लोकांचे अन्न दुर्भिक्ष कायमचे मिटवावे असे तिला कधी वाटले नाही. यंदाचे वर्षही याला अपवाद नाही. एक पाऊस न पडता तर होतीच नेहमीची ओरड. माचणूरचा उत्सव होतो की नाही, याची शेवटपर्यंत चिंता. अनेकांनी देवाला साकडे घातले. देव शेवटी धावून आला. पुरेसा पाऊस पडला. माणसे पुन्हा चिंता न करायला, आकाशाकडे डोळे लावून बसायला मोकळी झाली.

 वर्षानुवर्षे हे असे चालूच आहे. त्यांना जमिनीकडे पाहायला कुणी सांगितलेच नाही. दहा-बारा वर्षांपासून मात्र, या वृत्तीत थोडा बदल घडवून आणावा या उद्देशाने माचणूर या ठिकाणी एक केंद्र सुरू करण्यात आले. शुद्ध विठ्ठलभक्ती बरोबरच लोकांचे ऐहिक कल्याण साधावे या दृष्टिकोनातून या केंद्राची उभारणी होऊ लागली. प्रथम प्रथम सांप्रदायिकांचा विरोधही झाला. यंदा उत्सवाच्या चालकांना गुरांचे व सुधारलेल्या शेतीतंत्राचे एक प्रदर्शन भरवायचे होते. शुद्ध सांप्रदायिकांना हे मान्य नव्हते. शासनानेही दुष्काळाची शक्यता होती म्हणून प्रदर्शनाला परवानगी नाकारली. त्यामुळे प्रदर्शन झाले नाही, पण पुढच्या वर्षी प्रदर्शन भरवण्याचा चालकांचा विचार आहे. सांप्रदायिक, नाखुषीने का होईना, या उपक्रमांना मान्यता देत आहेत. यंदा परंपरेला सोडून असलेल्या काही विषयांवर प्रवचने मात्र झाली, परिसंवाद-व्याख्यानांचे कार्यक्रम चालकांनी आवर्जून घडवून आणले. खेड्यापाड्यात विज्ञानाचा प्रसार कसा होईल या विषयावर पुण्याच्या नॅशनल केमिकल लेबॉरेटरीचे संचालक डॉ. टिळक यांच्या अध्यक्षतेखाली एक परिसंवाद झाला.

एक प्रयोग । १४१