पान:निर्माणपर्व.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 तो चार वर्षांपूर्वी भेटला तेव्हा आम्ही सर्वजण त्याला अंबरसिंग म्हणत असू. अरे-जारे करत असू. अक्राणी भागातील आमच्या दौऱ्यात तो सामानाची व्यवस्था पाहत होता.

 मोठा गोड बोलायचा, वागायचा. वाटेत भेटणा-या डोंगरांची नावे सांगायचा. आसपास घडलेल्या कथा ऐकवायचा.
 तो नणंदभावजयीचा घाट तर आजही आठवतो. दोघी नणंदा-भावजया आम्ही चाललो होतो त्याच मार्गाने निघाल्या होत्या. दिवस उन्हाळ्याचे होते. तहानेने फार व्याकुळल्या. सातपुड्याची एक रांग ओलांडून झाली. दुसरी आली आणि गेली. तरी पाण्याचा थेंब आढळेना. चालता चालता दोघीजणी एका टोकावर थांबल्या. त्राण संपले होते. पुढे पाऊल टाकवेनासे झाले. आसपास वस्ती नाही. बरोबर सोबत नाही. खूप तडफडल्या. शेवटी वाघाने खाल्ले की, टोकावरून त्या खाली दरीत कोसळल्या हे आदिवासींना माहीत नाही. त्यांचा शेवट येथे झाला असे तो मानतो एवढे खरे.

 ही जागा आजही सातपुड्यातील आदिवासींचे एक पूजास्थान आहे. जातायेताना आदिवासी स्त्री-पुरुष येथील एका झाडाला एखादी बांगडी, एखादी तांबडी चिंधी अडकवल्याशिवाय सहसा पुढे सरकत नाही.
 फार पूर्वी घडलेली ही कथा. आजही उन्हाळ्यात या भागातला आदिवासी पाण्यासाठी तडफडतच असतो.


 अंबरसिंगचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालेले आहे, हे मला आताच समजते आहे. भजने वगैरेचे पाठांतर तर खूप वाढले आहे म्हणे.
 हा मूळ शहाद्याजवळच्या पाडळदा गावचा रहिवासी.

 गाववाला म्हणून साहजिकच पाडळद्याचे भिल्ल आपल्या तक्रारी घेऊन याचेकडे वरचेवर येऊ लागले. हाही त्यांची लिखापढीची, कोर्ट-कचेऱ्यांची , पोलीस खात्यातली कामे करून देत राहिला.
 पाडळद्याच्या भिल्लवस्तीतून अशा स्वरुपाच्या तक्रारी सरकार दरबारी गुदरल्या जात होत्या -

 अर्जदार : सिताराम लिंबा भिल्ल. राहणार पाडळदे बु. ता. शहादे. विनंती अर्ज करितो की -

 सन १९६९ साली मार्च महिन्यात होळीच्या अगोदर मौजे मचकुर गावात गुजर व कोळी समाजाच्या लोकांनी आमचे आदिवासी वस्तीवर भयानक दंगा केला होता आणि आम्हा सर्व मुलाबाळांना हालअपेष्टेत ठेवले होते. दंगलीच्या परिस्थितीत आमचे वस्तीत येऊन माझ्या घरात श्री. श्रीपत विठ्ठल हा स्वतः आत

शहादे । १३