पान:निर्माणपर्व.pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 स्वप्नांचे वेड हा ज्याच्या स्वभावाचा स्थायीभावच असतो, त्याला मग नवे स्वप्न शोधावे लागते, नसले तर नवे निर्माण केल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. स्वप्नांशिवाय असा माणूस जगूच शकत नाही.

 खरे म्हणजे आपणही, सर्वसामान्य माणसेही कुठलीतरी स्वप्ने उराशी बाळगल्याशिवाय जगत नसतो.

 कुणाची स्वप्ने लहान, कुणाची मोठी.
 जेवढी स्वप्ने मोठी तेवढे स्वप्नभंगाचे दुःखहीं मोठे.
 पण दुःख मोठे, म्हणून स्वप्नांचे वेड सोडून देता येत नाही.
 आपले जीवनच स्वप्नांशिवाय अशक्य असते.

 आणि ‘मानवी स्वातंत्र्य' हे आजवर माणसाला पडत आलेले सर्वात मोठे, सर्वात सुंदर असे स्वप्न नाही का ?

 मानव जन्माला आला तेव्हापासून या स्वप्नामागे तो धावत राहिलेला आहे.

 मग प्राचीन काळी या स्वप्नाला मोक्ष म्हणत असतील. आपण अर्वाचीन याला मुक्ती म्हणत असू.

 या स्वप्नामागे धावण्याचे मार्ग वेगवेगळे असतील.

 पण प्रेरणा, ध्यास एकच. हा बंधनात अडकलेला मानव मोकळा, स्वतंत्र कसा होईल,राहील.

 बंधने तरी किती प्रकारची !
 बंधने निसर्गाची !
 बंधने परिस्थितीची - माणसाने माणसांवर लादलेली.
 बंधने स्वतःची, आपल्या प्रकृतिधर्माची.

 या सर्व बंधनातून माणसाला पार करत करत न्यायचे. माणसाने जायचे. किती लांबचा प्रवास. तांडा किती तरी मोठा. प्रवास धोक्याचा, प्रचंड गोंधळाचा.

 अनेकदा हा प्रवास ज्यासाठी चालू आहे तो हेतूच विसरला जातो. स्वप्नच हरवते. मग कुणी मार्क्स, कुणी गांधी येतो. पायात थोडे बळ, स्वप्नाची आठवण देऊन जातो.

 कुणी रॉय येतो. पायात बळ देण्याची विद्या त्याला अवगत नसते. पण तो स्वप्नांची आठवण करून देतो. प्रवासाचा हेतू सांगत राहतो.

तळ नाही तोवर बळ नाही । १३५