पान:निर्माणपर्व.pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्या जमिनी दानमार्गाने त्यांच्याकडून काढून घेण्याचा मार्ग स्वीकारला. काही यश मिळाले. लक्षावधी एकर जमिनीचे दान झाले.
 पण यातली अनेक दाने बनावट होती हेही हळूहळू उघडकीस आले.

 अशा बनावट दानांविरुद्ध चळवळ केली पाहिजे अशा मताचे खूप जण सर्वोदयात होते.

 विशेषत: जयप्रकाश व त्यांचे बिहारमधील कार्यकर्ते या मताचे होते. संपूर्ण बिहारदानाचे संकल्प सुटले, विनोबा बिहारमध्ये यासाठी ठाण मांडून बसले. तेव्हा जयप्रकाशांनी या बनावट दानांविरुद्धही चळवळ व्हावी असा आग्रह धरला होता; पण त्याही वेळी विनोबांनी जयप्रकाशांना अशी चळवळ करू दिली नव्हती. नेहरू अडचणीत येऊ नयेत ही विनोबांची तेव्हाची भूमिका होती. आजही विनोबांची तीच भूमिका कायम आहे. इंदिरा गांधी अडचणीत येऊ नयेत असे त्यांना वाटते. म्हणून त्यांनी जयप्रकाशांच्या संपूर्ण क्रांतीला, गुजरातमधील नवनिर्माण आंदोलनाला विरोध केला. जरी ही आंदोलने गांधीप्रणीत होती, हिंसाचाराला त्यात फारसे प्रोत्साहन दिले जात नव्हते तरी. पण या वेळी जयप्रकाश बदलले होते. त्यांचा स्वभाव जागा झालेला होता. संघर्ष हा त्यांच्या प्रकृतीतला एक घटक होता. तो कार्यवाहीत आला व विनोबांपासून ते दूर झाले. कोण कमी की जास्त गांधीवादी, कोण प्रामाणिक की ढोंगी, कोणता सर्वोदय खरा, कोणता खोटा हा प्रश्न नसून, प्रकृतिधर्म निर्णायक ठरतो, तत्त्वज्ञान शेवटी प्रकृतीला शरण जाते, जसा ज्याचा पिंड अशी त्याची कृती घडते व तत्त्वज्ञान प्रकृतीनुसार निरनिराळी रूपे, आकार धारण करते हे सत्य ओळखायचे की नाही, हा खरा प्रश्न आहे. विनोबांनी आणीबाणीला पाठिंबा दिला तेव्हा त्यांच्या अनेक चाहत्यांचा म्हणे भ्रमनिरास झाला. त्यांनी विनोबांना नाना तऱ्हेची दूषणे दिली. पण जी गाय आहे तिला घोडा समजण्याची चूक या चाहत्यांनी का करावी ? क्वचित एखादा गांधीजींंसारखा अपवाद आढळतो. ज्याच्यात गायीचे कारुण्य आणि अश्वाची गतिमानता यांचा एकत्रित संगम झालेला असतो. विनोबा इदं क्षात्रम्, इदं ब्रम्ह अशा वृत्तीचे कधीही नव्हते. त्यामुळे पंचवीस डिसेंबरला १९७५ पवनारला काही नाट्यपूर्ण घडेल असा संभवही नव्हता. दोष विनोबांचा नाही. त्यांच्याकडून खोट्या अपेक्षा बाळगणाऱ्यांचा आहे. शब्दांनी आपण भुलुन जाता कामा नये. शब्दांंमागील माणूस, त्याची प्रकृती, याही गोष्टी आपण पाहायला शिकले पाहिजे.प्रकृती सर्वांचे नियंत्रण करीत असते. व्यक्तीव्यक्तीची, तशीच समाजाचीही प्रकृती विचारात घ्यावी लागते. केवळ परिस्थितीचा विचार अपूर्ण आहे.

मनु'शासन पर्वाकडे । १२७