पान:निर्माणपर्व.pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



सांस्कृतिक प्रवाहही किती वेगळे आहेत ? तरीही तारा जुळतात. संदर्भ लागतात. आशय भिडतो. श्रेष्ठ कलाकृतीचे हे एक लक्षण आहे. तिचे सतत पुनरुज्जीवन होत राहते. नवे नवे आशय तिच्यात सहज सामावले जातात. स्थळकाळाची, वास्तवाची बंधन गळून पडतात.

 आँटिगनीचे समर्पण फॅसिझमविरोधात उभ्या ठाकलेल्या फ्रान्सच्या लढाऊ जनतेला दुसऱ्या महायुद्धकाळात प्रेरणा देऊन गेले, पण त्यातील क्रिऑन हा सत्ताधारीही नाटककाराने केवळ दुष्टमूर्ती दुःशासन म्हणून रंगवलेला नाही. त्याचीही एक तर्कसंगत अशी बाजू आहे...जी आपल्याकडे आज अनेकजण घेत आहेत. दोन विरुद्ध पण प्रामाणिक भूमिकांचा संघर्ष! केवळ सुष्टांचा आणि दुष्टांचा ढोबळ संघर्ष नाही. दोन्हीकडे सुष्टदुष्ट प्रवृतींची सरमिसळ आहे. त्यामुळे गुंतागुंत वाढत आहे; पण संघर्ष तर अटळ आहे. क्लेशदायक असला तरी..
 लागू असेच संघर्ष नेहमी भूमिकांसाठी निवडतात असे दिसते ! (सामना!)

मला मात्र नाटक फार Pregnent आहे असे वाटले. ग्रीक राजघराण्यातील संघर्ष येथे एका सनातन कुरुक्षेत्रीय पातळीवर पोचलेला आहे.


 आदिवासी भागात काम करणारे काही तरुण आज भेटले. थोडी बातचीत झाली. .शेतमजुरांसाठी किमान वेतन कायदा आला. अंमलबजावणी नाही. मंत्री आले. त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. जमीनदारांनी कायद्याप्रमाणे वेतन देण्याचे मान्य केले. मंत्र्यांची पाठ फिरल्यावर पुन्हा जैसे थे. तरी बरं, मंत्री आदिवासींंपैकीच आहेत .

 पूर्वी मोर्चे वगैरे काढून परिस्थिती बदलवून घेता येत होती. आता व्यक्तिगत तक्रारी नोंदवा म्हणतात. हे कसं शक्य आहे ? आणि शक्य असलं तरी त्यातून कितीसं काम साध्य होणार ?

 कर्जनिवारण कायद्याचा हाच अनुभव. सुरुवातीला सावकारांच्या घरात भांडीकुंडी परत नेण्यासाठी गर्दी लोटली. पोलीस त्या वेळी गरिबांच्या बाजूने हस्तक्षेप करीत होते; पण आता पोलिसांनी अंग काढून घेतले आहे. त्यामुळे सगळा मामला थंड पडला आहे. सावकार अधिकच सावध बनले आहेत. भांडीकुंडी,इतर वस्तू गहाण ठेवून घेत नाहीत. एकदम खरेदी घेतात. म्हणजे आगीतून निघून फुफाट्यातसुद्धा नाही. पुन्हा आगीतच.

 आदिवासींना, शेतमजुरांना किरकोळ कर्जे सारखी लागतात. भरमसाठ व्याजाने का होईना, सावकार ती त्यांना वेळेवर देत होता. वेळेवर उपयोगी पडणे हा त्याच्या असण्याचा फायदा होता. इतके कायदे, सुधारणा होऊन आदिवासी

निर्माणपर्व । १२२