पान:निर्माणपर्व.pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 माणूस संपादकांनी प्रा. बंग यांना पत्रोत्तरी लिहिले--

 "जनता सरकार हेच जयप्रकाशांच्या चळवळीचे आता खरे मर्मस्थान आहे. क्रांतीपूर्वकालात रशिया-चीनमध्ये सोव्हिएट्सने जी कामगिरी बजावली ती कामगिरी आपल्याकडे ही जनता सरकारे बजावू शकतील. म्हणून त्यांच्या स्थापनेकडे व कारभाराकडे अधिक लक्ष पुरवायला हवे आहे ......"

 जिथे, ज्या भागात, ज्या राज्यात ही स्थापनेचीही वेळ अद्याप आलेली नाही, तिथेही यादष्टीने वाटचाल व्हायला हवी आहे. पर्यायी सत्तांचे असे स्वायत्त तळ उभारले गेल्याशिवाय चालू कोंडी फुटणार नाही. नवी वाटही दिसणार नाही. संपूर्ण क्रांती अभिप्रेत असणाऱ्यांना या पद्धतीने आपल्या पक्षांची, संघटनांची पुनर्बांंधणी करावी लागणार आहे. या ठोस कामाऐवजी मोरारजींच्या उपोषणासारख्या वरवरच्या उपायांच्या मलमपटया करण्यात विरोधी पक्ष, संघटना, जयप्रकाशांसारखे संपूर्ण क्रांतीचे उद्गाते कितीकाळ खर्च करणार आहेत ? इंदिराजींच्या सत्तेला एक बारिकसा शह म्हणून फार तर संपूर्ण क्रांतीवादी शक्तींनी मोरारजींच्या उपोषणाला पाठिंबा देणे, काही लाक्षणिक कृती करणे समजू शकते. पण यापेक्षा अधिक महत्त्व अशा कार्यक्रमांना दिले जाऊ नये. उत्तम प्रशासक असले तरी मोरारजी स्वतःही एक हुकुमशाही प्रवृत्तीचे राज्यकर्तेच आहेत. जुन्या मुंबई राज्यात त्यांनी विरोधी शक्तींचे केलेले शिरकाण विसरले जाऊ नये. या मोरारजींनी बाईच्या हुकुमशाहीविरुद्ध आवाज उठवावा, हा एक विनोदच आहे. संपूर्ण क्रांतीवाद्यांच्या दृष्टीने इंदिराजी आणि मोरारजी, यात तसा काही फारसा फरक नाही. एक सत्तेवर, दुसरा सत्तेबाहेर. सत्तामुक्त कुणीच नाही. मग संपूर्ण क्रांतीवाद्यांनी अशा डावपेचात, क्षुद्र लढाईत स्वत:ला फार अडकवून घेण्यात काय अर्थ आहे ? पुढील पाच सात वर्षे तरी दिल्ली वर्ज समजून काम केले, तर जयप्रकाश चळवळीला भवितव्य आहे. नाही तर मिळाले आहे तेही यश निसटून जाईल, पुन्हा पाटी कोरी दिसेल. 'चलो दिल्ली' हा अगदी शेवटच्या घटकेला दिला जायला हवा असा मंत्र आहे. आज दिल्लीतून बाहेर पडायची वेळ आहे. कारण दिल्लीचा सूर्य अजून मध्यान्ही आहे. अजून काहीकाळ तो तेथेच राहणारही आहे. तोवर वनवासात, विजनवासात, गिरिकंदरात नवी, छोटी लोकराज्ये स्थापन करणे. चालवणे, हाच एकमात्र क्रांतिकारक कार्यक्रम ठरू शकतो. जयप्रकाशांनी या कार्यक्रमाकडे अधिक लक्ष पुरवायला हवे. मोरारजीछाप कार्यक्रम हे फालतू वेळ दवडणे आहे.

एप्रिल १९७५
उथळ आणि खोल काम । ११३