पान:निर्माणपर्व.pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जयप्रकाशांनी लहान माणसांना जागे केलेले आहे. आता या बड्यांच्या खेळात गरजेपेक्षा जास्त लक्ष घालून, उगाच लुडबूड करून त्यांनी या लहान माणसाला विसरू नये, अर्ध्या वाटेतच त्याचा एकदा धरलेला हात सोडून देऊ नये. केवळ बिहारमध्ये जरी जयप्रकाशांनी या लहान माणसाला उभे केले, संघटित केले, तेथील राजकारणावर-अर्थकारणावर या लहान माणसाचा प्रभाव पडू लागला, तरी ती एक फार मोठी कामगिरी ठरेल. हे ठोस व मुख्य महत्त्वाचे काम सोडून जयप्रकाश उगाच दिल्लीच्या आसपास रेंगाळत राहिलेले आहेत. कुणी तरी त्यांना सांगितले पाहिजे--त्यांनी बिहारमध्येच तळ ठोकून संघटनात्मक कामाकडे अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे म्हणून. आता खोल कामाची अवस्था आहे, अपेक्षा आहे. व्यापक फैलाव पुरेसा होऊन गेलेला आहे.

 खोल काम म्हणजे ग्रामीण व शहरी भागात जनता सरकारांचे तळ उभारणे, या तळांचे एकमेकांशी नाते जोडणे, लोकांना कारभाराचे, अनुशासनाचे प्रत्यक्ष शिक्षण देणे, आपले भवितव्य आपण घडवीत आहोत असा अनुभव त्यांना प्राप्त करून देणे.

 जयप्रकाशांचे एक ज्येष्ठ सहकारी, बिहार आंदोलनाचे एक प्रथमपासूनचे समर्थक व प्रमुख संघटक प्रा. ठाकुरदास बंग यांचे नुकतेच एक पत्र ‘ माणूस' संपादकांना आलेले आहे. त्यात त्यांनी लिहिलेले आहे---

 “ बिहार आंदोलनाच्या समर्थनासाठी मी या भागात (कोल्हापूर) ३ दिवसांपासून भ्रमंतीवर आहे. काल सांगलीत 'माणूस' चा २३ मार्चचा अंक पाहिला. 'साम्यवादी पर्याय नको असेल तर' हा आपला लेख वाचला. मनस्वी आवडला. झकास वठला आहे. तुमचे प्रारंभीचे चळवळीचे विश्लेषण अनुपम आहे ......

 "आता तपशीलातील दोन तीन मुद्यांबाबत लिहितो. आर्थिक प्रोग्राम अलीकडच्या काळात मांडला गेला आहे. बेघरांना गावात घरासाठी जमीन देणाऱ्या कायद्याची जनता सरकारने अंमलबजावणी करणे, सीलिंग कायद्याची गावच्या पातळीवर de facto चौकशी, ग्रामसभा भरवून, ठराव करून, अंमलबजावणी करून भूमिहीनांना जमीन वाटणे या कार्यक्रमांना जनता सरकार अग्रक्रम देईल असे ठरले आहे. निकटच्या भविष्यात याची अंमलबजावणी अनेक खेडयांतून झालेली आपणास दिसेल.

 " RSS ने आपले कार्यक्रम नवीन संदर्भात तपासावेत. RSS व सर्वोदयवाद्यांनी जवळ यावे. नित्य संघर्ष व शुद्धिकरणाची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवावी--आदि मांडणी योग्य आहे."

निर्माणपर्व । ११२