पान:निर्माणपर्व.pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





उथळ आणि खोल काम





 उत्तरेकडे; दिल्लीत; खुद्द बिहारमध्ये जयप्रकाशांची चळवळ अधिकाधिक उथळ होत चालली आहे की काय, अशी शंका येते.

 मोरारजी देसाई यांचे उपोषण हा या उथळपणाचा एक नमुना.

 गुजराथमध्ये दुष्काळ आहे. भ्रष्टाचार-भाववाढ हे प्रश्न आहेतच. यासाठी मारजींचे उपोषण असते तर त्याला व्यापक सहानुभूती लाभली असती.
 पण मोरारजींचे उपोषण यासाठी नव्हते. गुजराथमध्ये निवडणुका लवकर घ्या ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
 खरोखरच ही आजची निकडीची गरज आहे का ? अगदी गुजराथपुरते बोलायचे झाले तरी निवडणुकीसाठी तेथील जनता अगदी आसुसलेली आहे काय ? का निवडक राजकीय शक्तींना वा व्यक्तींनाच जाणवणारी ही निकड आहे ?
 या मागणीचा जनतेच्या आजच्या हालअपेष्टांशी तसा निकटचा संबंध नाही. त्यामुळे लोकांच्या जिव्हाळ्याची ही मागणी ठरत नाही.

 मोरारजींच्या उपोषणाकडे म्हणूनच केवळ राजकीय डावपेचाचा एक भाग म्हणून पाहणे भाग पडते .

 त्यादृष्टीने मोरारजींनी वेळ चांगली निवडली हे मान्य केले पाहिजे.

 मोहन धारियांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्यात आले. हा धक्का हा स्फोट शांत होतो न होतो, तोच मोरारजींनी उपोषणाला सुरुवात केली. धारियांच्या वेळेपेक्षा यावेळी इंदिराजी थोड्या जास्त पेचात आल्या. कारण प्रश्न मोरारजींच्या प्राणाशी खेळण्याचा होता आणि कितीही बदनाम झालेली व्यक्ती असली तरी मोरारजींना गुजराथच्या व एकूण देशाच्या राजकारणातही काही विशिष्ट स्थान अजूनही आहे. त्यांचे प्राण धोक्यात येणे ही बाईंंना न परवडण्यासारखी गोष्ट होती. म्हणून त्यांनी झटपट तडजोड करून टाकली.

 जयप्रकाशांनी आपल्या चळवळीचा रोख वळवावा असे या उपोषण प्रकरणात काही नव्हते, हा बड्यांचा खेळ होता व बड्यांनाच तो खेळू द्यायला हवा होता.

उथळ आणि खोल काम । १११