पान:निर्माणपर्व.pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जागृत जनगटांच्या द्वारा लोकसेवकांनी राजसत्तेवर अंकुश ठेवणे हा जयप्रकाशांच्या आजच्या चळवळीचा मुख्य आशय आहे. राजसत्ता कुठलीही असो, तिचे केंद्रीकरण होत असते. सत्तेचे वर्तुळ हळुहळू लहान होत जाते, आकुंचन पावते. या केंद्रीकरणामुळे भ्रष्टाचार वाढतो व या भ्रष्ट वर्तुळातून सत्तेला पुन्हा बाहेर काढणे, ती लोकाभिमुख करणे अवश्य होऊन बसते. केवळ निवडणुकांवर विसंबून ही लोकाभिमुखता टिकवून धरता येत नाही. इतर अंकुशांचीही गरज भासते. जयप्रकाशांच्या चळवळीतून असा एक प्रभावी अंकुश निर्माण होत आहे, झालेला आहे.या अर्थाने हा लोकशाही शुद्धीकरणाचा प्रयोग आहे असे मानावे लागेल. हा प्रयत्न सतत चालू राहिला पाहिजे. कारण सत्तेचे केंद्रीकरण, भ्रष्टीकरण सतत चालू असते.ते भांडवलशाहीत असते, तसेच समाजवादी देशातही असते. दोन्हीकडच्या भ्रष्टतेचे स्वरूप फक्त वेगवेगळे असते. चीनमध्ये क्रांती होऊन पंधरा-वीस वर्षे उलटली नाहीत तोच माओला हा शुद्धीकरणाचा प्रयोग, सांस्कृतिक क्रांतीद्वारा हाती घ्यावा लागावा, याचा अर्थ दुसरा काय होतो ? कुठलीही एक व्यवस्था स्थिरावली की, ती जड होऊ लागते, आणि या जडतेतून अनेक बाजूंनी भ्रष्टाचाराला पाय फुटत राहतात. भ्रष्टाचार याचा अर्थ मूळ ध्येयवादापासून लांब जाणे. मूल्यांचा विसर पडणे. तत्त्व आणि व्यवहार यांची फारकत होणे. ही फारकत कमी करणे हा शुद्धीकरणाचा अर्थ. ही फारकत नेहमी होत असते म्हणून शुद्धीकरणही नेहमी होत राहिले पाहिजे. ही फारकत कमी करा, असे जयप्रकाशांनी सांगितले व त्यांच्या चारित्र्यबळामुळे हे त्यांचे सांगणे लोकांनी मनावर घेतले, आपापले लहान-सहान मतभेद विसरून लोक त्यांच्यामागे जमा झाले. ही फारकत कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न इंदिरा गांधींनी केला तर जयप्रकाशांच्या चळवळीचा आजचा जोर ओसरेलही. पण इंदिरा गांधींनी अगदी लढाईचाच पवित्रा घेतलेला आहे. सुसंवाद अशक्य करून टाकलेला आहे. म्हणून जयप्रकाशांनाही खोलखोल पाण्यात उतरणे भाग पडत चालले आहे. सुसंवादाची वेळ अजूनही पूर्णपणे गेलेली आहे असे नाही. उद्या पाकिस्तानचे वा चीनचे आक्रमण झालेच, तर सगळे संदर्भ पुन्हा बदलतील, सुसंवाद झकत करावाच लागेल. मग तो आजच का केला जाऊ नये ? आपला लोकशाही प्रयोग ध्रुवीकरणापेक्षा अशा सुसंवादांमुळेच यशस्वी ठरण्याची अधिक शक्यता आहे.

मार्च १९७५
निर्माणपर्व । ११०