पान:निर्माणपर्व.pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वगैरे विशेषणे कमी का लावली गेली ? पण भारतीय जनतेने या टीका, ही विशेषणे मुळीच मनावर घेतली नाहीत. उलट या तथाकथित शास्त्रीय विचारसरणीच बदनाम झाल्या, एकाकी पडल्या. जयप्रकाशांच्या बाबतीत आज हे घडून येत आहे. डावे गट जयप्रकाशांना आज फॅसिस्ट किंवा फॅसिस्टांचे म्होरके ठरवीत आहेत. पण लोकांचा या टीकेवर मुळीच विश्वास नाही. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत पार रसातळाला गेलेल्या सार्वजनिक नीतीमत्तेची आणि चारित्याची शुभ्र ध्वजा पुन्हा उभारली गेलेली लोकांना दिसत आहे आणि लोक यावर विसंबून जयप्रकाशांच्या मागे जात आहेत. जयप्रकाशांचे आवाहन मुख्यत: नैतिक आहे,ते या अर्थाने. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला लोकांनाही पाहवत नाही. तो असणारच, चालू समाजरचनेत तो अपरिहार्य आहे, वगैरे पुस्तकी पंडितांची विश्लेषणे खरी असोत वा नसोत-लोकांना या विश्लेषणांच्या पलीकडे जाणारा काही स्वच्छ आदर्शाचा नि:संदिग्ध आग्रह धरला जायला हवा आहे. जयप्रकाश आज असा आग्रह धरीत आहेत. आणि हेच त्यांच्या यशस्वितेचे आज तरी मुख्य कारण आहे, इतरांजवळ नसलेले त्यांचे हे एक प्रमुख बलस्थान आहे.

 हे उघड आहे, की जयप्रकाशांची चळवळ केवळ नैतिक स्तरावरची असती तर आज ती इतक्या चर्चेचा, टीकेचा, विरोधाचा आणि आकर्षणाचा विषय झालीच नसती. नैतिकता हा तिचा मूळ पाया आहे; पण या पायावर आता राजकीय लढ्याचा एक किल्लाही उभा राहिलेला आहे. गेल्या २५-३० वर्षांत, दिल्लीच्या एकछत्री, एकपक्षीय सत्तेला शह देऊ शकेल असे नैतिक-राजकीय आंदोलन भारतात उभे राहू शकले नव्हते. केरळ-बंगालात साम्यवादी राजवटी आल्या आणि गेल्या. तामीळनाडूमध्ये द्रमुकसत्ता आहे. पंजाबमध्ये अकाली राजवट होती. ६७ च्या निवडणुकीनंतर, उत्तरेत ब-याच राज्यात संविद सरकारे आली. पण जयप्रकाशांच्या चळवळीइतकी या विरोधी राजवटींनी दिल्लीच्या सिंहासनाला धडक दिलेली नव्हती. या सिंहासनातला थोडाफार वाटा या राजवटी मागत होत्या, इतकेच. थोडीफार देवाण-घेवाण करून, कधी याचा वाटा काढून त्याला संतुष्ट ठेवून, एकाविरुद्ध दुस-याला खेळवत राहून दिल्लीचे सिंहासन स्थिर राहू शकत होते. मजबूतपणे कारभार करू शकत होते. जयप्रकाश चळवळीने मात्र वाटा वगैरे न मागता सिंहासनाच्या मुळावरचे सरळ सरळ आघात केला. दिल्लीची राजवट भ्रष्टाचारावर उभी आहे, देशातील भ्रष्टाचाराचे मूळ केंद्र दिल्लीत आहे, दिल्ली हलवल्याशिवाय देश बदलता येणार नाही, पाटण्याची लढाई थेट दिल्लीपर्यंत नेऊन भिडवावी लागेल, असे जयप्रकाश सांगू लागले आणि लोक त्यांचे मानू लागले. दिल्लीची सत्ता यामुळे आज अस्वस्थ आहे, अस्थिर आहे. तिची विश्वासार्हताच (Credibility) हळूहळू कमी होत आहे, धोक्यात सापडली आहे. पूर्वीच्या विरोधी पक्षीय चळवळीतून असा

साम्यवादी पर्याय नको असेल तर ! । १०५