पान:निर्माणपर्व.pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



प्रथमच जयप्रकाशांचे आंदोलन सुरू आहे. उद्दिष्टे अजून अस्पष्ट आहेत; सहकारी पर्ण विश्वासातले नाहीत; हाताशी एखादा संघटित पक्ष वा निष्ठावंत अनुयायांचा गट नाही. सर्वांना मुक्तद्वार आहे. तरीही वर्षापूर्वी सुरू झालेली ही यात्रा हळूहळू पुढे सरकत आहे. दिल्लीलाही एक धडक मारून झालेली आहे. सुरुवातीला केवळ भ्रष्टाचार निर्मूलन हे मर्यादित उद्दिष्ट होते. यात्रा पुढे सरकली तसे उद्दिष्ट अधिक व्यापक वनले. नवी क्षितिजे दिसू लागली. मोठा व दूरचा पल्ला दृष्टीसमोर आला. भ्रष्टाचार निर्मूलनाला, बेकारी कमी करणा-या शिक्षणसुधारणेची मागणी जोडली गेली. यात्रेत नवीन लोक आले. काही जुने गळाले. जुन्या-नव्यांचा मेळ घालण्यात काही वेळ गेला. विरोधकांचे हल्ले झाले. ते परतविण्यात शक्ती खर्च झाली. वाटचालीतच, वरोबर असतील त्यांच्याशी सहविचार, काही ध्येयधोरणात्मक चर्चा वगैरे. सगळेच उघड्यावर. मुक्त. मनात त्यावेळी असेल ते जयप्रकाश बोलून टाकतात, घरच्यासारखे. मग ती लाखोंची सभा असो, दहा-पाच कार्यकर्त्यांची बैठक असो. बोललेले सगळे ब्रह्मवाक्य म्हणून स्वीकारले गेलेच पाहिजे असा त्यांचा अट्टाहासही दिसत नाही. तरी वेळप्रसंगी कणखर भूमिका घेतली नाही, असेही नाही. घाई नाही, पण यात्रेत खंडही पडू दिलेला नाही. लय एकूण संथच, जशी ती गांधीजींची होती. म्हणून यात्रेत लाखो लोक समील होऊ शकत होते. वेग बेताचा होता आणि मुख्य म्हणजे गांधीजींचे आकर्षण होते. गांधीजींचे विचार, त्यांची मते, सर्वांना पटत होती असे नाही; पण हा देवमाणूस सांगत होता चला म्हणून आणि लोक फारसा मागचा पुढचा विचार न करता चालू लागले होते. गांधीजींच्या जवळ कुठे क्रांतीच्या, समाज परिवर्तनाच्या अगोदर ठरवून घेतलेल्या योजना होत्या ? वेळ येईल तसतशी एकेक कल्पना त्यांना सुचत गेली, ती ते सांगत गेले. कित्येकदा मागची आणि पुढची कल्पना वेगवेगळी असे . तरी गांधीजींची चळवळ वाढत गेली, स्वराज्य यात्रा लांबत-फैलावत गेली. विचारांपेक्षाही लोकांची गांधी या व्यक्तीवर श्रद्धा होती. हा माणूस आपल्या भल्यासाठी काहीतरी सांगून राहिला आहे, याला व्यक्तिगत असा कुठलाही स्वार्थ चिकटलेला नाही, सत्ता आणि संपत्तीचा याला मोह नाही, लोकेषणेच्याही हा पलीकडे पोहोचलेला आहे, हा साधू आहे, हा महात्मा आहे, असे लोकांना मनोमन जाणवले आणि लोक त्याच्यामागे गेले. जयप्रकाश चळवळीचेही आजचे मुख्य बळ व आकर्षण जयप्रकाश ही व्यक्ती आहे. त्यांचे विचार नाही, कार्यक्रम नाही. हा माणूस निरिच्छ आहे, सत्ताप्राप्ती हा त्याचा उद्देश नाही असे लोकांना वाटत आहे. राजकारणालाही साधुत्वाची डूब देणा-या गांधी परंपरेचा हा वारसा आहे, नवे आविष्करण आहे आणि भारतीय जनतेला या आणि अशाच आविष्करणाची आतून ओढ असते, हे आजवर अनेकदा दिसूनही आलेले आहे. गांधीजींवर डाव्या, शास्त्रशुद्ध वगैरे विचारसरणीतून कमी का टीका झाल्या ? त्यांनाही प्रतिगामी

निर्माण पर्व । १०४