पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मी इथं १९५० ला जन्मलो. लहानांचा मोठा झालो. लग्न इथंच...इथल्याच मुलीशी! आज निवृत्त. मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मी साठी ओलांडली. माझं घर आश्रम झालाय! मुलं, सुना, नातवंडे, नातेवाईक... मी सनाथ...स्वाधार! माझ्यासारखे अनेक अनेक...मोजता नाही येणार...अन् माहीतही नाहीत इतके अज्ञान! परवा आषाढी वारी झाली...माझं हे घर जन्मघर, जनवास घर, कर्मघर, मर्मघर पाहायला गेलो. राम गणेश गडकरी बऱ्याच काळाने कुंडलला गेले तसे...त्यांना पूर्वीचे कुंडल भेटलं, दिसलं नाही तेव्हा ते म्हणाले होते... 'कृष्णाकाठी आता, पहिले कुंडल नाही' तसंच वाटलं...'चंद्रभागातीरी आता पहिले घर नाही.' एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक सरलं. मी माझ्याच काळाची साठ वर्षं उलटतो तेव्हा लक्षात येतं...त्याग, समर्पण, सेवाभाव, सचोटी, साऱ्याच शब्दांना आता बहिष्काराचा शाप लागलाय! नाही म्हणायला एक झालं. र. धो. कर्व्यांच स्वप्न साकारलं. लोक संततिनियमनाची साधनं वापरू लागले अन् कुमारीमातांचं होणं कमी झालं. त्यामुळे आपसूकच कर्णाचा वनवास संपुष्टात येतो आहे...ते अंगराज बनताहेत! पण जागतिकीकरण एक नवा फंडा घेऊन आलाय. ते श्रीमंतांना अधिक श्रीमंत करतंय नि गरिबांना महागरीब! ज्यांना मुलं होतात ते सांभाळतात. ज्यांना मुली होतात ते टाकतात... सोडतात.! जत्रेत, रेल्वेत, महाकुंभात अन् महानगरात...वस्ती, झोपडपट्टीतील एक, दोन, तीन मुली...एका घरातल्या सोडल्या...टाकल्या जातात! कळतं...आई बाबांना सोडून गेली! कधी बाबा व्यसनी म्हणून तर कधी दुसरे बाबा आवडले म्हणून! काळ क्रूर असतो नि मनुष्य निष्ठर. त्यामुळे प्रश्न चेहरे बदलून येतात...प्रश्न संपत नाही...भय जसं संपत नसतं तसं! 'भय इथले संपत नाही'. संस्थांनी पण कात टाकली पाहिजे! नवे प्रश्न तर नवी उत्तरेही द्यायला हवीत...वृद्ध, परित्यक्ता, एड्सग्रस्त, दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबे, स्थलांतरितांचे तांडे...समाजाचे नवे प्रश्न आहेत. ते जात, धर्मापलीकडे जाऊन माणूस, अर्थ, गरज, प्रश्न इ. निकषांवर सोडवायला हवेत. नाहीतर मग संस्थेच्या इमारती मोठ्या...संस्था छोटी...संस्था मोठी...माणसं छोटी...असं विषम चित्र नव्या समर्पणाला आवाहनच देत राहणार! संस्थेला 'घर' करायचं असेल, तर तिची घरघर संपवायला हवी. जिथं शापित अहिल्या असते तिथे राम जन्मतो खरा! पण इथं आधीच उशीर झालाय!

•••

निराळं जग निराळी माणसं/४६