Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
राणीचा जाहीरनामा - अशक्य सनद ! बंगालमधील जागृति.

मानास्पद कायदे!! राज्यकारभारांत तर भाग नाहींच इंग्लंडने शंभर वर्षे राज्य केलें तरी हिंदुस्तानचें पाऊल पुढे पडत नाहीं; परंतु तेंच जपान पहा! पन्नास वर्षांत त्यानें युरोपांतील राष्ट्रांच्या मांडीशी मांडी लावून बसण्याचा मान मिळविला. इंग्लंड बोलून चालून परकी. स्वतःच्या रंगाचे आयरिश लोकांस जर तर वगळतें तर हिंदुस्तान हें बोलून चालून काळ्यांचें राष्ट्र. आजपर्यंत शेंकडों अर्ज विनंत्या केल्या त्याचा यत्किंचितही परिणाम या कठोर सरकारावर झाला नाहीं. राणीच्या जाहीरनाम्यास आतां अशक्य सनद ठरवून टाकण्यांत आलें. जळफळणाऱ्या लोकांना तात्काळ शमविण्यासाठीं तो वरपांगी उपाय होता. कर्झनच्या कारकिर्दीत तर जास्तच दडपशाही माजली. सरकारी अंमलाची तांत गळ्याभोवती जास्तच घट्ट बसली. हिंदुस्तानांतील लोकांस एक बडी जागा देणें म्हणजे गोऱ्याची एक जागा कमी करणें नव्हे काय? आपल्या अंमलदारांस, इंजिनिअरांस, डॉक्टरांस, प्रोफेसरांस भरपूर पगाराच्या जागा देण्यासाठीच सरकारची सर्व चळवळ असावी असें लोकांस वाटू लागलें. इजिप्तमध्ये सुद्धां असाच धिंगाणा परोपकाराच्या पवित्र नांवाखालीं इंग्लंडने घातला. आपण चळवळ केली पाहिजे, ऐक्य-वृद्धि केली पाहिजे, ही जाणीव लोकांस प्रखरतेनें भासूं लागली. विशेषतः बंगालमध्ये ऐक्य जास्त सहजसाध्य होते. बंगालच्या मध्यभागी सर्व बंगाली लोकांची जूट होती. हे लोक सुशिक्षित, विद्वान, भावनाप्रधान असत. त्यांच्यामध्ये जोमदार माणसें पुढें येऊ लागलीं. उत्तम वर्तमानपत्रे निघू लागली. सरकारला हे लोकांमधील वाढतें ऐक्य पाहवेना. बंगालची फाळणी करण्याचें कर्झन साहेबांच्या मनांत आलें. बंगाल प्रांत फार मोठा आहे. तेव्हां त्याचा राज्यकारभार सुरळीत चालवावयासाठी आम्ही त्याचीं दोन छकलें करतों असें गव्हर्नर जनरलनें जाहीर केलें, राज्यकारभार नीट होत नसेल तर तो गव्हर्नरच्या हाताखालीं इलाखा करा असें सर हेन्री कॉटन यांनी सुचविलें. परंतु लोकांचें तुकडे पाडण्याचा ज्याचा उद्देश त्यास हें कसें पटणार? त्याशिवाय गव्हर्नर हा इंग्लंडमधून नेमला जातो; लेफ्टनंट गव्हर्नर तर गव्हर्नर जनरलचा अधिकारी असतो. तोच त्याची नेमणूक करतो. यामुळें गव्हर्नर नेमण्याची बुद्धि कर्झनास पटेना, प्रथम जेव्हां कर्झन साहेबांनी