________________
लायकीचे असतील, तर ती व्यक्ती आदरणीय कशी ठरावी ? तो ज्या संप्रदायाविषयी उदात्तनिष्ठा बाळगून आहे असे म्हणतो, त्या संप्रदायाच्या कल्याणासाठी स्वतःच्या मुलीचे हितसुद्धा नाकारतो; त्या संप्रदायाचे मोठेपण तेवढ्याच प्रकर्षाने जाणवणे आवश्यक आहे; पण येथे तर तो केवळ व्यसनाधीन दारूड्यांचा संप्रदाय वाटतो. अशा संप्रदायासाठी निष्ठा दाखवणाऱ्या शुक्राचार्याची व्यक्तिरेखाच जेथे उदात्त ठरत नाही, तेथे त्याचे अधःपतन शोकांत कसे ठरावे ? शुक्राचार्य सांप्रदायिक निष्ठेमुळे देवयानीचे सुख नाकारतो, असे सामान्यतः म्हटले जाते; पण ही सुद्धा एक गफलत होते आहे, असे वाटते. शुक्राचार्य ही अत्यंत • विद्वान आणि अहंकारी व्यक्तिरेखा आहे. सामान्यतः लोकोत्तर विद्वत्तेला अहंकार शोभूनही दिसतो. तसा तो शुक्राचार्यानाही शोभून दिसला असता. वादाचा मुद्दा शुक्राचार्य अहंकारी आहे, हा नाहीच. तर तो अत्यंत स्वार्थी, आत्मकेंद्री आहे आणि थोडेसे धाडसाने तरीही जबाबदारीने एक विशेषण त्याला द्यावेसे वाटते की, तो 'ढोंगी ' ही आहे. कसा ? देवगुरू बृहस्पतीने अपमानित केल्यामुळे तो दानवपक्षाला येऊन मिळाल्याचा उल्लेख आहेच. बृहस्पती हा शुक्राचार्याचा प्रतिस्पर्धी आहे. त्याच्यावर विजय मिळवणे, त्याच्या वरचढ होणे, ही शुक्राचार्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे कच आपले शिष्यत्व पत्करून आला आहे, या गोष्टीचा शुक्राचार्याला मनापासून आनंदच होतो आहे. 'माझ्या जावयाला हुंडा म्हणून मी संजीवनी विद्या देईन' अशी घोषणा त्याने केली, तेव्हा ती ऐकूनच देवांनी कचाला शुक्राचार्याकडे पाठवले. त्यात शुक्राचार्याची मर्जी संपादन करण्यापेक्षा देवयानीची मर्जी संपादन करण्याचीच कामगिरी पर्यायाने त्याच्यावर देवांनी सोपवली होती. कचाचा शिष्य म्हणून स्वीकार करताना शुक्राचार्याचे मनही फार निर्मळ होते, असे म्हणता येणार नाही. एखादा व्यवहारी बाप ज्याप्रमाणे जावयाचे सर्व गुण पाहून मग त्याच्यावर आपल्या मुलीने प्रेम करायला हरकत नाही, असा उदारपणाचा आव आणून परवानगी देतो, तसेच येथे शुक्राचार्याचे वर्तन आहे. कच रूपगुणसंपन्न असा मुलीला अनुरूप वर आहे, याची खात्री झाल्यावर त्याने पुढचा डाव टाकलेला आहे. 'कचावर प्रेम कर, ' असे शुक्राचार्यच देवयानीला सांगतो आणि वृषपर्व्यालाही तसेच सांगतो. त्यामागचे त्याचे धोरणही सांगतो - ‘अधिराज, कचावर प्रेम करायला मीच देवयानीला सांगितले, हे खरे आहे. ' (अं० १, प्र० १) आणि लगेच पुढे म्हणतो, '... पण देवयानी, प्रेमाच्या वेसणीमुळे तू कचाच्या ताब्यात जावेस, अशी माझी त्यावेळी इच्छा नव्हती व आजही नाही. (अं० १, प्र० १) ९२ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर