Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असे भीम म्हणतो आणि 'धिक्कार असो तुमच्या धर्माला आणि शांत शीलाला । ' (अं० १, प्र० घ), असे म्हणून त्याचा धिक्कार करतो. 'तुमचा धाकटा भाऊ म्हणवून घेण्याची मला लाज वाटते.' (अं० १, प्र० ३) अशी स्वतःची निर्भत्सनाही करवून घेतो. इकडे कीचकाचा मदांधपणाही तेवढ्याच अग्रपणाने व्यक्त होत राहतो. एका यःकश्चित दासीने आपली अवज्ञा करावी, हेच त्याच्या क्रोधाचे कारण आहे. कारण तो मदांध सत्ताधारी आहे. प्रजा आपल्या इच्छेच्या इशाऱ्यावर नाचण्यासाठीच आहे, अशी त्याची भूमिका आहे. खाडिलकरांचा कीचक स्त्रीलंपट नाही; परंतु सत्ताधारी उपभोक्ता आहे. ज्या स्त्रीची तो इच्छा करील, ती त्याच्या सेवेत हजर झालीच पाहिजे, ही त्याची मागणी आहे, आग्रह आहे. एका दासीने पातिव्रत्याचा टेंभा मिरवून नकार देणे, हा त्याच्या अहंकारी व्यक्तिमत्त्वाला झालेला जहरी डंख आहे. त्यामुळे सुदेष्णेच्या महालात तो संतापाने जेवणाचे ताट भिरकावून देतो. 'अन्नाचा शाप लागेल अशाने,' अशी कंकभट सूचना करतो, तेव्हा, 'ज्यांना दुसऱ्यांची आर्जवे करून भिक्षा मागून अन्नाचे दोन घास मिळवायचे असतात, त्यांनी पाहिजे तर अन्नाला डोक्यावर घेऊन नाचावे... अन्नच काय जगातील सुखोपभोगाचे सर्व पदार्थ मजकरिता आहेत. (अं० २, प्र० २) कीचकाच्या शब्दाशब्दातून, वाक्यावाक्यातून असा सत्तेचा मद व्यक्त होत राहतो, तरीही सैरंध्री येत नाही. सुदेष्णेनेच तिला मुद्दाम दूर पाठवून आपला अपमान करण्याचा घाट घातला आहे, असे वाटून तो बहिणीचाही उपमर्द करतो. कीचकाच्यामुळेच आपले राज्य टिकले आहे, याची जाणीव असलेला आणि पराक्रमशून्य विराट राजा त्याच्यापुढे लाचार आहे. अखेर कीचकपत्नी रत्नप्रभा दासी सैरंध्रीच्या बाजूने रदबदली करते. 'सैरंध्रीच्या ठिकाणी मी आहे समजा...' असेही ती सुचविते. तेव्हा तो खाडकन तिला बजावतो, 'जो न्याय तुला, तो तिला केव्हाही लागू करता येणार नाही. ' कारण काय, तर 'राज्यकर्ते ते राज्यकर्ते आणि दास ते दास ।' (अं० २, प्र० ४ ) सत्ताधाऱ्याच्या मदोन्मत्तपणाचा हा कळस आहे. लॉर्ड कर्झनच्या वक्तव्यातून याच आशयाचे वाक्य प्रेक्षकांनी ऐकलेले असते आणि हे वाक्य ऐकताच प्रेक्षकांच्या मनात कर्झनचीच आकृती उभी राहते. एकदा कीचक हाच कर्झन हे प्रतीक निश्चित झाले की, बाकीच्या व्यक्तिरेखांची ओळख पटणे कठीण राहत नाही. जिच्यावर कर्झन आक्रमण करू पाहते, ती द्रौपदी मग भारतमातेचे प्रतीक ठरते. सदैव सबुरीचा उपदेश करणारा कंकभट मवाळ- पंथीयांचे पुढारी, सनदशीर मार्गांनी इंग्रजांपुढे तक्रारी मांडण्याचा उपदेश करणारे नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे प्रतीक ठरतो, तर सदैव प्रतिशोधासाठी आक्रमक पवित्रा घेऊन अपमानाने धुसमुसणारा भीम जहाल- पंथीयांचे आक्रमक समजले नाटककार खाडिलकर ८१