________________
कवीच्या ‘प्रिन्सेस' या दीर्घकाव्याची आहे, असे टीकाकारांचे म्हणणे आहे; मात्र खाडिलकरांनी तसे कोठेच म्हटले नाही. उलट 'जैमिनी अश्वमेध' नावाच्या पुराणातील हिमालयात केवळ स्त्री राज्य स्थापन करणाऱ्या प्रमिला नामक स्त्रीची कथा येथे आहे. पुरुषांच्या विरोधी बंडाची तिची भूमिका आहे. अशात अर्जुन अश्वमेधासाठी दिग्विजयाकरता निघाला आणि या स्त्री राज्यात पोहचला. अर्थातच त्याने प्रमिलेचे राज्य जिंकले आणि एकपरीने स्त्रियांची बंडखोरी मोडून काढली. टेनिसन हा खाडिलकरांचा आवडता कवी होता; पण त्याच्या 'प्रिन्सेस चा 'बायकांचे बंड 'शी असलेला अनुबंध काकासाहेबांनी उल्लेखिला नाही. इंग्लंडमध्ये स्त्री-पुरुष समान हक्काविषयी संघर्ष सुरू झाल्याच्या काळातील 'प्रिन्सेस' ही रचना आहे. महाराष्ट्रात अजून हा विचार खूप दूर होता. ‘भाऊबंदकी' (१९०९) हे खाडिलकरांचे सर्वात महत्त्वाचे आणि लोकप्रिय झालेले नाटक ! ज्या रूपकनाट्यासाठी खाडिलकरांचा समीक्षक उल्लेख करतात, त्यात एकपरीने ऐतिहासिक कथेवरचे हे एकमेव रूपक नाट्य आहे. १९०७ मध्ये सुरत काँग्रेसमध्ये दुफळी झाली आणि राजकीय क्षेत्रात एक परीने आपापसांतच फूट पडली. त्यामुळे राज्यहिताला बाधा पोहचली. या पार्श्वभूमीवर 'भाऊबंदकी' हे नाटक समकालीन प्रेक्षकांनी अनुभवले. पेशवाईच्या अखेरीस राघोबादादा या स्वार्थी पेशवे कुलोत्पन्नामुळे दुफळी माजली आणि कायदेशीर वारस असलेल्या नारायणराव पेशव्यांचा खून करविण्यापर्यंत राघोबाच्या मनातील भाऊबंदकीची विषवल्ली फोफावली. तिला राघोबाची महत्त्वाकांक्षी पत्नी आनंदीबाई हिने केवळ खतपाणीच घातले असे नाही, तर नारायणरावाच्या खुनाची ती जणू सूत्रधारच झाली. राज्यकत्यांमध्ये आपसातच दुफळी माजली, भाऊबंदकीमुळे स्वार्थांधता आली, तर सर्वनाश होण्याखेरीज हाती काही येत नाही, असा संदेश हे नाटक देते. अशातही न्यायप्रिय, निःस्पृह रामशास्त्रींसारखा न्यायाधीश असेल, तर अधःपातापासून राज्य सावरले जाऊ शकते, अशीही सूचना हे नाटक देते. समकालीन राजकीय परिस्थितीवर ऐतिहासिक कथावस्तूच्या आधारे हे नाटक लिहिताना राघोबा, आनंदीबाई, नारायणराव पेशवे, रामशास्त्री प्रभुणे हे पेशव्यांचे न्यायाधीश या वास्तव इतिहासातील पात्रांच्या जोडीला नमकशास्त्री - चमकशास्त्री, त्यांच्या दुर्गा-म्हाळसा या भांडकुदळ पत्नी ही काल्पनिक पात्रसृष्टी निर्माण करून त्यांच्या आधारे 'भाऊबंदकी' हे गतिमान आणि प्रभावी नाटक खाडिलकरांनी लिहिले आहे. हे नाटक १९०९ मध्ये रंगभूमीवरही आले. त्याआधी थोडेच दिवस लो० टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरून त्यांना मंडालेच्या कारावासाची शिक्षा झाली होती. त्यांचा खटला लोकांसमोर ताजा होता. २७८ ३ नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर