Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाटके प्रामुख्याने 'संगीत' असल्यामुळे प्रयोगाशी - 'पाहण्याशी' त्यांचे आद्य नाते होते. खाडिलकरांचे वैशिष्ट्य हे आहे की, त्यांनी नाट्यलेखनाचा आरंभ गद्य नाटकाने केला. 'संगीत' त्यात औषधालाही नव्हते. पहिले नाटक 'सवाई माधव - रावाचा मृत्यू'चे लेखन १८९३-९४ मधले आहे. नंतर 'कांचनगडची मोहना' (१८९७), ‘कीचकवध' (पौराणिक, १९०७), 'बायकांचे बंड' (१९०७) (त्यात नंतर संगीत घातले), 'भाऊबंदकी' (१९०९), 'प्रेमध्वज' (१९१०) ही सर्व नाटके गद्य आहेत आणि यात ऐतिहासिक, पौराणिक अशी दोन्ही प्रकारची नाटके आहेत. या नाटकांनी त्यांना नाटककार म्हणून मराठी नाट्यसृष्टीत सुप्रतिष्ठित केले होते आणि या क्षेत्रातील 'नाट्यसंमेलनाध्यक्ष' पदाचा सन्मानही दिला होता. (१९०७ मध्ये ते प्रथम नाट्यसंमेलनाध्यक्ष झाले.) खाडिलकरांनी नाट्यलेखनाच्या क्षेत्रात संगीतविरहित गद्य नाटकाला प्रारंभ केला आणि सुप्रतिष्ठितही केले. नाटककार म्हणून हे त्यांचे मोठे सामर्थ्य आहेच. महाविद्यालयीन काळातील शेक्सपिअरच्या नाटकांचा प्रभाव हा त्यांचा एक प्रेरणास्रोत आहे. 'सवाई माधवरावाचा मृत्यू' (१८९३-९४) हे कृ० प्र० खाडिलकरांचे लिखित पहिले नाटक ! या नाटकाची प्रेरणा शेक्सपिअरच्या 'हॅम्लेट' आणि 'ऑथेल्लो'- मध्ये असल्याचे लेखकानेच सांगितले आहे. 'हॅम्लेट' हा नायक आणि 'ऑथेल्लो' मधील आयागो (यागो) हा खलनायक यांना एकत्र आणता येणार नाही का ? या कल्पनेच्या पायावर हे नाटक उभे आहे; मात्र यासाठी त्यांनी अस्सल देशी कथावस्तू घेतली आहे, उत्तर पेशवाईतील चंचल, अस्थिर वृत्तीचा सवाई माधवराव हा पेशवा आणि त्याच्या या वृत्तीचे भांडवल करून अनेक प्रकारे पाताळयंत्रीपणा करीत सवाई माधवरावाला अधिक विचलित करत नेणारा खलनायक केशवशास्त्री हे काल्पनिक पात्र. अशा खऱ्या आणि काल्पनिक मुख्य पात्रांच्या आधारावर हे नाटक उभे आहे. उत्तर पेशवाईतील अंदाधुंदी, राघोबादादांची अतिमहत्त्वाकांक्षा सतत फुलवीत ठेवणे, नाना फडणीस हा पेशव्यांचा खरा हितकर्ता असला, तरी माधवरावांच्या मनात त्याच्याविषयी सतत संशय आणि द्वेष जागता ठेवणे आणि हे अतिशय थंड डोक्याने करणारा केशवशास्त्री या सर्व पात्रांच्या कृती उक्तींची, घटना-प्रसंगांची घट्ट वीण ठेवणे, ही चांगल्या नाटकाची सर्व लक्षणे या पहिल्याच नाटकात ऐन २१ व्या वर्षी खाडिलकरांच्या लेखणीने प्रकट केली आहेत. ऐतिहासिक सत्य आणि त्या सत्याचा परिपोष करीत नेणारी काल्पनिक पात्रे, घटना-प्रसंग, नातेसंबंधांचे ताणेबाणे व्यक्त करणारे प्रभावी संवाद हे सर्व गुण या नाटकात एकत्र आले आहेत. केशवशास्त्री हे नाटककार खाडिलकर ७५