Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हीच नावे पुढे येतात, टिकून राहतात. हेही खाडिलकरांचे स्वतंत्र अर्जित आहे. खाडिलकरांबाबत वा० ल० कुलकर्णी म्हणतात, 3 ' ते खरे हाडाचे 'गद्य नाटककारच' होते. त्यांचे प्रत्येक चांगले नाटक हे प्रथम चांगले गद्य नाटक आहे. 'स्वयंवर', 'द्रौपदी', 'विद्याहरण' सारख्या नाटकांत खाडिलकरांनी पदे घातली आहेत, हा केवळ योगायोग आहे. ती संगीतामुळे मोठी झालेली नाटके नाहीत.' या वा० ल० यांच्या विधानाशी सहसा दुमत होणार नाही. प्रा० वा० ल० कुलकर्णी यांनी उल्लेखिलेल्या नाटकांतील सर्व पदे जरी वगळली, तरी रसग्रहणात किमान वाचताना तरी काही फरक पडत नाही. प्रयोगाच्या आस्वादात फरक पडत असेल, तर ते प्रामुख्याने गायक नटांचे श्रेय असेल, असते. (अपवाद 'सं० मानपमान') त्यातील गद्यच खरे महत्त्वाचे. नाटकाचे यश किंवा अपयश हे गद्यावरच प्रामुख्याने अवलंबून असते. त्यामुळे आपोआपच समीक्षेत लिखित संहिताच प्रामुख्याने विचारात घेणे योग्य ठरेल. गद्य नाटकाच्या प्रयोगाला अनुसरून समीक्षा होत नाही, असे नाही. खुद्द खाडिलकरांच्याच नाटकांची तशी ती झाली आहे. गद्य नाटकांच्या प्रयोगाचे यशही संहितेमुळेच वाढण्याची शक्यता अधिक असते. मूळ नाटकच ठिसूळ पायावर उभे असेल, तर नट, दिग्दर्शक, नेपथ्यकार इत्यादींचे टेकू लावूनही नाटक प्रयोगात फारशी उंची गाठू शकत नाही, हा अनुभव आहे. केवळ वाचनापेक्षा अशा नाटकाचा प्रयोग अधिक परिणामकारक होऊ शकतो, हे खरे असले, तरी दोन्हींतील अंतर फारसे लक्षणीय नसते. उलट एखाद्या चांगल्या गद्य नाटकाला प्रयोगसामग्रीची योग्य साथ मिळाली नाही, तर प्रयोगात संपूर्ण अपयश येऊ शकते. खाडिलकरांच्या नाटकांचा विचार म्हणूनच प्रयोगनिरपेक्ष व्हावा. कारण तसा होण्यातच खाडिलकरांना खरा न्याय मिळेल. खाडिलकरांच्या नाटकाची प्रवृत्ती प्रामुख्याने चिंतनशील, विचारगर्भ नाट्याची आहे. पद्यापेक्षा गद्य हे चिंतनाचे आणि विचारांचे अधिक समर्थ असे वाहक आहे. त्यामुळे खाडिलकरांच्या गद्य नाटकांना वेगळे मूल्य प्राप्त होते, असेही खाडिलकरांचे सामान्यपणे सर्व समीक्षक मानतात. प्रा० वा० ल० कुलकर्णी आणि प्रा० ना० सी० फडके हे त्यात प्रमुख होत. खाडिलकरांची प्रतिभा 'अनुभव- नाट्या'च्या शोधात होती. ते अनुभवनाट्य त्यांच्या चिंतनशील प्रवृत्तीतून घडले, असेही म्हटले जाते. मानवी जीवनातील अनुभवांची गूढता, व्यामिश्रता शेक्सपिअरने एखादी अलीबाबाची गुहा उघडावी, तशी आपल्या नाटकांतून मांडली आहे. खाडिलकरांचा पिंड जीवनचिंतकाचा असल्याने शेक्सपिअरचा परिणाम त्यांच्यावर प्रकर्षाने झाला. त्या परिणामातूनच त्यांचे 'सवाई माधवरावांचा मृत्यू' नाटककार खाडिलकर ७१