Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाढत गेली, तसतसा मराठी नाट्यरचनेवर त्यांचा परिणाम होत गेला. किर्लोस्कर यांच्या संगीत नाटकांचा तर इतका मोठा प्रभाव या काळात होता की, संपूर्ण गद्य असे पौराणिक नाटक १९०० पर्यंत औषधालासुद्धा सापडत नाही; पण सामाजिक विषयावरील गद्य नाटकांचा प्रारंभ याच काळात होतो. या सामाजिक विषयावरील नाटकांना ‘नाटक' ह्या संज्ञेपेक्षा 'प्रहसन' म्हणणे योग्य. तसे म्हटलेही आहे. मुख्य मुद्दा हा की, या निमित्ताने का होईना, गद्य नाटकांचा प्रारंभ मराठी रंगभूमीवर होतो. तसेच शेक्सपिअरची नाटके भाषांतरित किंवा अनुवादित करताना गद्याचे सामर्थ्य लक्षात येऊ लागले. तोवर नाटकातील गद्याचे स्थान नगण्यच होते. आता सामाजिक विषयावरील पहिले म्हणविले जाणारे 'शारदा' नाटक हे 'संगीत' करण्याचा मोह देवल यांना आवरला नाही किंवा शेक्सपिअरची भाषांतरे रूपांतरेही 'संगीत' करण्याचा मोह त्या काळात आवरला नाही, हे खरे आहे; परंतु 'शारदे'तील 'संगीत' हे 'सौभद्रा'प्रमाणे अपरिहार्य नाही. 'शारदे'तील सर्व पदे गाळून नाटक वाचले किंवा प्रयोग केला, तर नाटक उभे राहण्यात कोठे बाध येतो, असे वाटत नाही. संगीताच्या अतिरेकी प्रभावातून झालेल्या शेक्सपिअरच्या भाषांतरात तर अनेकदा संगीतानेच केवळ बाध येतो, असे दिसते; परंतु एखादी प्रवृत्ती एखाद्या काळात लोकप्रिय झाली की, कित्येकदा तिला अनिष्ट वळण लागते. तसा हा प्रकार म्हणता येईल; परंतु नाटकातील गद्याचे स्थान हळूहळू या काळात उमगत होते, हे खरे आहे. त्याचा परिणाम म्हणजे संगीताला अजिबात फाटा देऊन संपूर्ण गद्य नाटक समर्थपणे, स्वतंत्रपणे उभे राहू शकते, असे सिद्ध करणारा लेखक खाडिलकरांच्या रूपाने १९ व्या शतकाच्या अखेरच्या दशकातच पुढे आला. खाडिलकरांच्या नाटकातील गद्याच्या स्वतंत्र स्थानामुळे त्यांच्या नाटकांचा विचार संहितेखेरीज करणे, हा अन्याय आहे, अपुरेपणा आहे. प्रयोगाच्या अनुषंगाने खाडिलकरांच्या नाटकांचा विचार समकालीन समीक्षकांनी केला असेल, तर ते एकवेळ क्षम्य मानता येईल. कारण किर्लोस्करी संगीत नाटकांचा विचार प्रयोगाच्या अनुषंगानेच करणे योग्य होईल. ती सवय समकालीनांत होती; पण खाडिलकरांना आजही तोच निकष लावणे योग्य नव्हे. खाडिलकरांनी ऐतिहासिक, पौराणिक किंवा काल्पनिक नाटके लिहिली. त्यांनी गद्य आणि पद्य (संगीत) नाटके लिहिली. त्यामुळे त्यांना 'सव्यसाची नाटककार ' म्हटले जाते, ते योग्यच आहे. खाडिलकरांचा विचार करताना त्यांच्या नाटकातील राजकीय रूपकांचा उल्लेख पुनःपुन्हा केला जातो. समकालीन समीक्षक तर तो करतातच; परंतु नंतरही नाटककार खाडिलकर / ६९