________________
अन्वयार्थ (इन्टरप्रिटेशन) कशा प्रकारे लावला जातो, हे महत्त्वाचे असते. कठीण तर असतेच. जुनी घटिते आणि व्यक्तिरेखा यांची दर वेळी नव्याने जाण कलावंताला येते आणि ती तो व्यक्त करतो. जीवन एकीकडे स्थिर असते आणि एकीकडे बदलतही असते आणि दैवतकथा ही समूहमनाची नेणीव शब्दबद्ध करते, तेव्हा जीवनाच्या गतीनुसार ती बदलतही असते आणि स्थिरही असते. त्यातील बदल आणि स्थिरत्व यातील सीमारेषा शोधून त्यातील नेमका नवेपणा व्यक्त करणे, ही तारेवरची कसरत असते. बदलत्या मूल्यसंदर्भात नवेपणाही बदलत असतो आणि तो ज्या वेळी दैवतकथेतून जाणवतो, तेव्हा ती कथा पुराण- जुनी असूनही ताजी टवटवीत असते. दैवतकथेसंबंधी नाट्याच्या संदर्भात विचार करताना आणखी एक अडचण येते. पावित्र्य अपावित्र्य, धार्मिकता या गोष्टी अपरिहार्यपणे दैवतकथेशी संबंधित असतात. आधुनिक विज्ञानयुगात देव आणि धर्म यांविषयी अनेक अंगांनी चिकित्सा होत असता दैवतकथा धार्मिकतेच्या पकडीतून झपाट्याने सुटून जात आहे. नाट्यक्षेत्रात प्रयोगात धार्मिकतेपासून मुक्तीचा प्रारंभ विष्णुदासांपासून झाला आहे. आता प्रश्न असा आहे की, धर्म बंधनाखेरीज दैवतकथेला स्वतंत्रपणे अस्तित्व टिकवून राहण्याइतपत अवसर आहे का ? एकीकडे धर्म ही संकल्पना कालबाह्य आहे, असे म्हणत असताना साहित्यात मात्र दैवतकथेचे पुन्हा नव्याने आविष्करण जगभरच्या साहित्यात चालू असलेले दिसते. वरवर पाहता हा गमतीशीर विरोधाभास असला, तरी त्यावरून दैवतकयेचे टिकून राहण्याचे सामर्थ्य अंगभूत असल्याचा प्रत्यय येतो. देशकालातीत अशी मानवी जीवनातील मूल्ये अभिव्यक्त करण्याचे तिचे सामर्थ्य आहे, असे म्हणावे लागते. त्यामुळेच निरनिराळ्या सामाजिक परिस्थितीत एकाच दैवतकथेचा कल्पनाबंध पुनःपुन्हा नवनवीन अन्वयार्थांचे धुमारे फुलवीत येत असतो. प्रत्येक काळातील रचना ही आपल्या परीने अपूर्व ठरते. त्या त्या समाजाला ती कथा 'आपली' वाटावी, इतकी ताजीही असते. या पार्श्वभूमीवर कृ० प्र० खाडिलकरांच्या पौराणिक नाटकांचा विचार करावयाचा आहे. खाडिलकरांची दहा नाटके पौराणिक आहेत. ती अशी : १. कीचकवध (१९०७) - गद्य नाटक २. सं० विद्याहरण (१९१३) - संगीत नाटक ३. सत्त्वपरीक्षा (१९९४) - गद्य नाटक ४. सं० स्वयंवर (१९९६) - संगीत नाटक ५. सं० द्रौपदी (१९२०) - संगीत नाटक ६. सं० मेनका (१९२६) - संगीत नाटक ७. सवतीमत्सर (१९२७) - गद्य नाटक नाटककार खाडिलकर ६७