Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'हिंदूंचा तत्त्वविचार हा एक विषय असा आहे की, त्याकडे आस्थेने लक्ष देणाऱ्यास त्याचा कधीच वीट येत नाही. पाश्चिमात्यांनी उपनिषद आणि वेदान्त विचाराची महती गायली आहे. तेव्हापासून म्हणजे एकोणिसाव्या शतकारंभापासून वेदान्त विचाराची कालोचित उपयुक्तता लक्षात आली आहे. वेदान्त आणि लौकिक व्यवहारात परस्पर विरोध नाही. उलट व्यवहाराची शुद्धता आणि सफलता वेदान्तावर आहे, हे लोकांना कळत चालले आहे. ' देशोद्वाराला वेदान्ताची आवश्यकता आहे, असे त्या काळाच्या आसपासच्या लोकप्रिय विचारवंतांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांची उदाहरणेही काकासाहेबांनी दिली होती. त्यात प्रामुख्याने स्वामी विवेकानंद ( शिकागोच्या जागतिक सर्वधर्म परिषदेतील व्याख्यान), लो० टिळक (गीतारहस्य), योगी अरविंद (तत्त्वज्ञान आणि प्रवचने), म० गांधी (गीतेतील अनासक्त कर्मयोगाकडे असलेला ओढा आणि विवेचन ) या सर्वांचा उल्लेख असे. अर्थात काकासाहेबांचे गुरू लो. टिळक यांच्या 'गीतारहस्या'ने काकासाहेबांच्या तत्त्वचिंतनाला भक्कम आधार मिळाला होता. मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी वेदान्त - उपनिषदविचार हा देशकालातीत आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. 'ऐतरेयोपनिषदातील चौथ्या खंडाच्या दुसऱ्या अध्यायात माणसाच्या तीन जन्मांची कथा आहे. त्यावर काकासाहेबांनी केलेले भाष्य आजही मौलिक वाटेल असे आहे. आपला स्वतःचा आणि आपल्या पुत्राचा जन्म हे दोन जन्म, आणि मरणोत्तर जन्म हा तिसरा जन्म, हे सांगताना उपनिषदात 'वयोगतः ' हा शब्द आला आहे. 'वयोगतः ' हा शब्द येथे वृद्धावस्थेचा वाचक आहे, अशा भूमिकेतून 'समाजात वृद्धांचे कार्य' त्यांनी आवर्जून सांगितले आहे. उपनिषदांवरील प्रवचनांच्या पुस्तकात हा सर्व विचार संग्रहित केला आहे. वृद्धांच्या कार्याविषयी ते म्हणतात, 'आपल्या हातून आपल्या आयुष्यात उत्तम कामगिरी झाली नाही, तरी आपल्या मुलाने ती करून दाखवावी, असे माणसास वाटत असते. सरकारी नोकर गांधीटोपी घालणाऱ्या आपल्या मुलाकडे कौतुकाने पाहतो आणि अभिमानाने ती गोष्ट आपल्या मित्रांना सांगतो, हे आपण पाहतो.' (ऐतरेयोपनिषद, पृ० ५०) यात उदाहरण जरी त्यांच्या काळातील असले, तरी बापाचे मन आजही तेच आहे, असे दिसते. आपली अपुरी इच्छा मुलाने पूर्ण केली, तर वाटणारे बापाचे समाधान सर्वकालिक आहे. काकासाहेबांच्या मनात राष्ट्रोद्धारविषयक विचाराला अग्रक्रम असल्याने त्यांनी तत्संबंधी उदाहरणांचा विस्तार केला आहे. पुढे ते म्हणतात, 'वृद्धाला आपण मेल्यावर मुलांचे काय होईल, याची काळजी असते. कुटुंबाप्रमाणे राष्ट्रातही पुढील पिढीच्या कल्याणाची चिंता वाहणारे म्हातारे असतात. राष्ट्राला पूर्ण स्वराज्य मिळो ६० । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर