________________
झाले नाही; पण टिळकांचे 'गीतारहस्य' हा त्यांच्या चिंतन-मननाचा आणि अभिमानाचा विषय होता. त्यामुळे आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी प्रवचनांद्वारे एका अर्थी आपल्या गुरूंच्या टिळकांच्या 'गीतारहस्या'तील तत्त्वज्ञानाचाच प्रचार केला. ही प्रवचने काही उपनिषदांवरची आहेत; पण उपनिषदांसह सर्वच प्रवचने वैदिक तत्त्वज्ञानासंबंधीची आहेत. उपनिषदांपैकी ईश, ऐतरेय, तैत्तिरीय आणि बृहदारण्यकातील ‘याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद' यांचे संपूर्ण कथन केले असून रुद्र, संध्यावंदन आणि पुरुषसुक्त हे उपनिषदांबाहेरचे विषय आहेत. रुद्राला क्वचित उपनिषदाची मान्यता मिळते. रुद्रावर लिहिण्यापूर्वी एका संपादक मित्राजवळ दोन महिने काकासाहेब संथा घेत होते. कोणताही विषय हाती घेतला की, सर्वांगाने अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती अखेरपर्यंत दिसते. ऐन उमेदीत कीर्तने करण्याचा प्रसंग आला, तर गाणे आवश्यक असल्याने काही दिवस त्यांनी रीतसर गाण्याचे शिक्षण घेतले होते, या प्रसंगाची येथे आठवण होते. ‘त्रिसुपर्ण’, ‘ॐकाराची उपासना' यांवर अनेकांनी लिहिले आहे, तरी आपले वेगळेपण व्यक्त करणारी 'खाडिलकरांचा रूद्र', 'खाडिलकरांचे उपनिषद' अशी आपली स्वतंत्र नाममुद्रा त्यांनी उमटवली. 'त्रिसुपर्णावर' त्यांनी सांगलीच्या हायस्कूलमध्ये १९३७ मध्ये (१९ डिसेंबर) प्रथम व्याख्यान दिले. ते लगेच छापले गेले. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसमोर अशा तात्त्विक विषयावर व्याख्यान होणे, ही आज शिक्षणक्षेत्रात आश्चर्य वाटावी अशी बाब आहे. काकासाहेबांना स्वतःला योगाभ्यास प्रिय होता. त्यामुळे प्रवच विवेचनाच्या ओघात स्वानुभव कथन होई. त्यामध्ये योगातील पारिभाषिक संज्ञा वापरल्या जात. आपण 'केसरी'कडे कसे गेलो ? यासंबंधी सांगताना योगाभ्यासाचा उपयोग नकळत कसा झाला, हे त्यांनी सांगितले होते. देशसेवेकरता लिहिण्याची आच स्वप्नरूपाने मार्गदर्शक ठरल्याचे त्यांनी सांगितले होते. दत्तभक्तीचा छंद असल्याने नित्य प्राणायाम करण्याकडे त्यांची वृत्ती असल्याचेही त्यांनी सांगितले. अगदी अखेरच्या दिवशी अखेरचा श्वास घेण्यापूर्वी काही काळ त्यांनी प्राणायाम केला होता. योगविषयक अनुभव सांगताना त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, 'नाटके लिहू लागलो असताना किंवा वर्तमानपत्रातील मजकूर सांगत असताना केव्हा केव्हा माझे मन एकाग्र होत असे. दहा-पंधरा वर्षांपूर्वीपासून मन एकाग्र होऊ लागले म्हणजे मला 'अनाहत ध्वनी ऐकू येण्याचा पाया रचला गेला. ' या काळात आपल्या गतायुष्यातील शीघ्रकोपादी दोषांचे चिंतन जणू ते करू लागले. 'रागीटपणाचे आणि अभिमानाचे पातक म्हणून अर्धांगवायूने आजारी ५८ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर