________________
भागवले, तरी पुण्यातील एकाचे कर्ज भागू शकले नाही. ते सारे हप्त्यांनी काकासाहेबांनी फेडून टाकले. हे दातृत्व केवळ कर्तव्यभावनेने त्यांनी केले होते. मुंबईच्या छापखान्यात ते प्रामुख्याने आपल्या नाटकांची पुस्तके छापत. त्याचबरोबर अनेक लहान-मोठी वृत्तपत्रे सवलतीच्या दराने छापीत. त्यात मराठी, काँग्रेस विचारांच्या पत्रांबरोबरच इंग्रजी आणि कम्युनिस्ट पत्रेही होती. आपल्या सहकाऱ्यांच्या आर्थिक हितासाठी ते हे करत. नाटकांच्या जाहिरातींच्या छपाईची कामेही होती; पण पैसे देण्याच्या बाबतीत कोणाची अडचण आली, तर त्याला प्रसंगी बिल माफही करत. असे आर्थिक आतबट्ट्याचे व्यवहारही त्यांच्याकडून झाले; पण ते भाबडेपणाने नसून समजून, उमजून काही विचाराअंती झाले होते. काकासाहेबांकडे स्वावलंबन आणि स्वाभिमान हे गुण होतेच. प्रारंभीच्या काळात १८९७ मध्ये 'केसरी'चे काम करीत असताना त्यांचे नाव 'केसरी'वर नव्हते, तरी त्यांनी कर्तव्यबुद्धीने काम केले. पुढे १९०८ पासून १९०९ अखेरपर्यंत नाव छापले गेले; पण पुढे ते बंद झाल्याबरोबर त्यांनी 'केसरी' सोडला आणि गाजावाजा न करता नवीन नाटकाच्या लेखनाची तयारी केली. 'लोकमान्य'ची धुरा स्वाभिमानाने स्वीकारली आणि ती उत्तम प्रकारे सांभाळली; पण तेथे अवाजवी बंधने येताना दिसताच क्षणार्धात 'लोकमान्य' पत्र सोडले आणि पूर्ण स्वावलंबनाने 'नवा काळ' सुरू केला. पुढील इतिहास सर्वज्ञात आहे; मात्र कोणत्याही प्रसंगी व्यक्तिगत भावभावनांचे भांडवल तर केले नाहीच, पण जाहीर उच्चारही केला नाही. समधात वृत्ती आणि फलाविषयी उदासीनता ही गीतेची शिकवण त्यांच्या आचाराचा भाग झाली होती. काकासाहेबांच्या खाजगी जीवनातील स्थूल घटनाप्रसंगांचा उल्लेख पूर्वी झालाच आहे. त्यांच्या अगदी व्यक्तिगत आवडी-निवडींविषयी थोडे लिहिले, तर ते गैर होणार नाही. खाण्यापिण्याबाबत ते गोडाचे विशेष भोक्ते होते. स्नेह्यांकडे लग्नसमारंभादी प्रसंगी भोजनाला गेले की, सर्वसाधारण पंक्तीत न बसता बाजूला बसून केवळ पक्वान्नाचे ताट मागवून त्यावर ताव मारत. पक्वान्नाला ते 'मुद्देमाल' म्हणत. अर्थात ही ऐन उमेदीतील गोष्ट! मात्र नंतर मधुमेहाने आक्रमण केल्यावर ही आवड बाजूला ठेवणे भाग पडले. काकासाहेबांना विडीचेही व्यसन होते. त्यांचे मित्र चित्रशाळेचे वासूकाका जोशी विडीचा निषेध करीत. काकासाहेबच त्याविषयी सांगत की, 'चित्रशाळेत विड्या ओढू लागलो की, वासूकाका त्यांचा निषेध करीत. केव्हा तरी नकळत ही व्यक्तिवैशिष्ट्ये आणि आध्यात्मिक चिंतनशीलता ५५