Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतापाने उसळले. क्रोधाच्या भरात तोंडून अर्वाच्य शब्दही निघाले. मॅनेजरला तत्काळ कामावरून दूर केल्याचे सांगितले. नंतर शांतपणे विचार करता आपण उतावळेपणाने अशा प्रकारे आणि अशा भाषेत संताप व्यक्त करणे गैर होते, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मॅनेजरकडे माणूस पाठवला. सतत तीन दिवस निरोप पाठवूनही तो आला नाही. तेव्हा 'तुम्ही आला नाहीत, तर मी येईन, असा निरोप पाठवल्यावर तो आला आणि काकासाहेबांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर त्यांचे संबंध पूर्ववत झाले. असे अनेकदा होत असे; मात्र कोणाच्याही चुकीमुळे झालेला प्रश्न एकदा मिटला की, पुन्हा उल्लेख करायचा नाही, ही त्यांची रीत होती. काकासाहेब स्वतःच्या मतांशी प्रामाणिक होते. त्यामुळे कानाच्या हलकेपणाने कोणाचे काही ऐकून वागणे किंवा बोलणे त्यांच्याकडून घडत नसे. दुसरे कोणी अकारण परनिंदा करीत असेल किंवा खुद्द काकासाहेबांची खुशामत करत असेल, तर त्यांना गप्प करत; पण जर ते कोणीही अडचणीत आले, तर त्यांना समभावाने मदत करत. 'आत्मस्तुतीबाबत मुके आणि परनिंदेबाबत बहिरे' असे त्यांचे व्यक्तिमत्त्व असल्याचे न० २० फाटक म्हणतात. वस्तुतः न० चिं० केळकर यांनी काकासाहेब खाडिलकर यांच्या बाबतीत अनेकदा नुकसानकारक आचार आणि उच्चार केला होता. न० चिं० केळकरलिखित खुद्द ' टिळकचरित्रा 'तही असे उल्लेख आहेत; पण एकदा खाडिलकरांच्या बैठकीत त्यांचे स्नेही शि० म० परांजपे, वासूकाका जोशी, चिंतामणराव वैद्य, अमरावतीचे वीर वामनराव, सीताराम केशव दामले वगैरे मंडळी जमली असता निघालेल्या बोलण्यात केळकर - जयकरांविषयी काही कुत्सित उल्लेख आले; तेव्हा त्या हास्यविनोद बैठकीतून ते सरळ उठून बाहेर गेले. कारण 'दुसऱ्याची निंदा करण्या- प्रमाणे ती ऐकणे हेही पाप आहे, असे त्यांचे मतही बोलून दाखवले होते. 'परनिंदेची आवड हे नीतिभ्रष्टतेचे लक्षण आहे,' असे त्यांचे मत होते आणि आचरणही होते. ‘आत्मस्तुती आणि परनिंदा हा बुद्धीचा रोग आहे. खरजेच्या खाजेप्रमाणे तो क्षणभर गोड वाटला, तरी तो रोगच! तो माणसाचा घात केल्याशिवाय राहत नाही,' हे त्यांचे उद्गारही न० २० फाटक यांनी दिले आहेत. मात्र हा नियम व्यक्तिगत - खासगी जीवनासाठी होता; पण सार्वजनिक हिताच्या आड जर हा नियम आला, तर टीकाकाराचा यथास्थित समाचार घेतल्याखेरीज ते राहत नसत. या ठिकाणी त्यांच्यातला जातिवंत पत्रकार जागा होत असे. व्यक्तिवैशिष्ट्ये आणि आध्यात्मिक चिंतनशीलता । ५३