Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चारित्र्याविषयीची निष्ठा राहण्यामागे अदृश्यपणे टिळकांचा असलेला आदरयुक्त धाक अशा कितीतरी बाबींचा प्रत्यय येतो. इतकेच नव्हे, तर 'केसरी'त आपण लिहिलेल्या लेखांमुळे टिळकांना दोन वेळा कारावास भोगावा लागला, याची खंत त्यांच्या मनात असल्याचे त्यांनी लिहिले आहे. पुढे ‘नवा काळ' मधील लेखामुळे खुद्द काकासाहेबांवर जेव्हा खटला भरला, तेव्हा निकालाच्या दिवशी आपल्या सहकाऱ्याकडे त्यांनी काढलेले उद्गार त्यांच्या टिळकांविषयीच्या भावनेचे निदर्शक आहेत. 'आज आपल्याला शिक्षा झाली, तर टिळकांना आपल्या लेखांमुळे झालेल्या शिक्षेची थोडी तरी भरपाई होईल,' असे त्यांनी म्हटले होते. 'लोकमान्यांची शिकवणूक' हा टिळकांच्या निधनानंतर दहाव्या दिवशी, १० ऑगस्ट १९२० रोजी काकासाहेबांनी 'केसरी'त लिहिलेला अखेरचा लेख ठरला. 'टिळकांच्या चरित्राचे आध्यात्मिक स्वरूप लोकांना समजावून देण्यासाठीच (हा लेख) लिहिला आहे. टिळक चरित्रावर आजपर्यंत लिहिल्या गेलेल्या लेखात या लेखाला अत्युच्च श्रेणीमध्ये बसवावे लागेल,' असे न० २० फाटक म्हणतात. 'लोकमान्य' च्या पहिल्या अंकातही त्यांनी टिळक चरित्राचेच गुणगान केले आहे. शिवाय टिळक आणि गांधी यांच्या चळवळीतील अभिन्नता स्पष्ट केली आहे. या ठिकाणी पुढे आचार्य शं० द० जावडेकरांनी लिहिलेल्या 'लोकमान्य टिळक आणि म० गांधी' या पुस्तकाची आठवण होते. म० गांधी हे टिळकांचेच कार्य पुढे नेत आहेत, हे मानणारा एक मोठा वर्ग टिळकांच्या निधनानंतर निर्माण झाला होता. त्याला विरोध करणाऱ्यांना प्रत्युत्तर देणारे लेखन काकासाहेबांनी पुढे वारंवार केले. 'नवा काळ' मध्ये तर प्रखर युक्तिवाद लढवून त्यांनी गांधीमार्गाचे महत्त्व सांगितले आहे. १९२४ मध्ये म० गांधी कारावासातून सुटून आल्यावर विरोधक क्रमाने निष्प्रभ होत गेले. म० गांधींच्या कारावासाच्या काळात काँग्रेसमधील फूट व गांधीविरोध वाढू नये म्हणून गांधीविचारांच्या वृत्तपत्रांना कसून काम करावे लागले. त्यात काकासाहेबांच्या 'नवा काळ' चे काम महत्त्वाचे आहे. १९२४ ते १९२९ या काळात म० गांधी यांच्यामुळे हिंदी राजकारण गतिमान झाले. कौन्सिलातील राजकारण नेहरू आणि चित्तरंजन दास यांच्यावर सोपवून सामान्य माणसे, स्त्रिया, ग्रामीण जनता यांना राष्ट्रकार्यात क्रियाशील करणारे जे उपक्रम म० गांधी यांनी हाती घेतले होते, त्यांचा पुरस्कार काकासाहेबांनी मनःपूर्वकतेने केला. खादीचा प्रसार, हिंदू-मुस्लीम ऐक्य, अस्पृश्यता निवारण, चरखा आणि सूतकताई अशा गांधींच्या उपक्रमांचे महत्त्व 'नवा काळ'ने सतत जनमानसात बिंबवले. ४८ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर