________________
घेणारे 'तालीम मास्तर' दिग्दर्शक म्हणून ते आग्रही होते. त्यासंबंधी नाटककंपनीशी कोणताही करार नसताना ते स्वेच्छेने तालमी घेत. ही त्यांची ख्याती होतीच. तशीच वृत्तपत्रक्षेत्रातही आपल्या हाताखालचे, बरोबरीचे या सर्वांनी सुसूत्रपणे कामे करावीत, यासाठीही ते प्रयत्नशील असत, हेही लक्षात येते. विशेषतः 'नवा काळ' हे स्वतःच्या मालकीचे पत्र सुरू केल्यानंतर हे नियंत्रण ठेवणे, त्यांना सुलभ झाले असणार. वृत्तपत्रातील भाषेविषयीही ते जागरूक असत. विशेषतः मूळ इंग्रजीतून आलेल्या बातमीचे मराठीकरण करताना फार चुका होत. कधी त्या गमतीदार असत, पण अनेकदा गंभीरही असत. काकासाहेबांनी वृत्तपत्र सृष्टीद्वारा मराठीला अनेक अन्वर्थक शब्द दिले आहेत. अनेकदा बातमीदार अल्पशिक्षित असत. त्यामुळे 'जसे शिक्षण तसे भाषांतर' हे एके प्रसंगी काकासाहेबांनी काढलेले उद्गार वस्तुस्थितीचे निदर्शक होते. मात्र त्यातूनही अचूकपणा यावा, यासाठी सर्व प्रकारचे कोश त्यांनी कामाच्या जागी ठेवले होते. त्याचा उपयोग संबंधितांनी करावा, हा हेतू होता. तरीही घोटाळे होत. १९२४च्या प्रारंभी म० गांधी यांचे अपेंडिसायटीसचे ऑपरेशन झाले. त्यावेळी ‘अपेंडिसायटीस'चे भाषांतर 'मूळव्याध' असे करून कंसात मूळ इंग्रजी शब्द दिला होता. एकदा पं० मोतीलाल नेहरूंनी चित्तरंजन दास यांना मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातील उतारा भाषणप्रसंगी वाचून दाखविला होता. त्यात - 'पुढील काळ जास्त संकटांचा असल्याने आपला मेंदू फार मोठ्या प्रमाणात शिणवावा लागेल, ' अशा आशयाचे वाक्य होते. इंग्रजी वाक्य होते- 'अवर ब्रेन्स विल बी टॅक्स्ड 'टू द अॅटमोस्ट'. भाषांतर केले गेले होते- 'आपल्या मेंदूवर पराकाष्ठेचा कर बसवला जाईल.' (पुढे कंसात मूळ इंग्रजी वाक्य.) त्यामुळे पितळ अधिकच उघडे पडले. 'वृत्तपत्राच्या कामाला प्रायः पांडित्याची गरज नसते,' असे काकासाहेबांचे मत असल्याने शालान्त शिक्षणापर्यंत (मॅट्रिक) शिक्षण झालेली माणसे ते हाताखाली नेमत; मात्र त्यांनी भाषांतर नीट करावे अशी अपेक्षा बाळगत. या ना त्या कारणाने राष्ट्रीय प्रवृत्तीच्या वृत्तपत्रांना कोंडीत पकडणे, त्यांच्यावर अब्रूनुकसानीचे - क्वचित राजद्रोहाचे आरोप करून खटले गुदरणे, हे नित्य चालत असे. विशेषतः राजद्रोहाचा आरोप हा गंभीर गुन्हा असून संपादकास जबर शिक्षा होई. एरव्हीच्या खटल्यात जबर रकमेचा जामीन घेतला जाई. काही तरी कारणे काढून जामिनाची रक्कम जप्त केली जाई. 'नवाकाळ' ही याला अपवाद नव्हता. अधून मधून त्या सर्वांना तोंड देत १९२९ पर्यंत काकासाहेब 'नवा काळ 'चा संसार ४२ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर