Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जाहिरात घेण्याला आणि छापण्याला काकासाहेबांचा विरोध नसून 'त्या एकाच जाहिरातीने पानाची शोभा घालवली, ' असा त्यांचा आक्षेप होता. इतकी वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात घालवल्यानंतर जाहिरातीशिवाय वृत्तपत्राला तरणोपाय नाही, हे त्यांना कळत होतेच; पण त्या जाहिरातीने मजकुराच्या सौंदर्याला बाधा येऊ नये, ही त्यांची भूमिका होती. आवेशाच्या भरात छपाई थांबवून त्यांनी यथायोग्यपणे जाहिरात व मजकुराची रचना करून दिली. अर्थात आधी छापून झालेले अंक रद्द केले. क्षोभ शमल्यावर त्यांनी जे स्पष्टीकरण दिले, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. 'मी मूळचा कलावंत असून नंतर पत्रकार आहे. ('फर्स्ट आय अॅम अॅन आर्टिस्ट (ड्रॅमॅटिस्ट) अॅण्ड दॅन ए जर्नालिस्ट' हे त्यांचे मूळ इंग्रजीमधील वाक्य). नाटकाचा दर्शनी पडदा वर जाताच नाटकाच्या प्रयोगाआधी जो देखावा प्रेक्षकांसमोर येईल, त्याने प्रेक्षक भारावून जाऊन त्यांच्या ठिकाणी एकंदर नाटकाविषयी उत्सुकता निर्माण झाली पाहिजे, अशी माझी योजना असते. जिच्या योगे विरस होईल, ती कला कसली ?' (न० र० फाटक, पृ० २६) हा प्रसंग आणि उद्गार सर्वश्रुत आहेत. यावरून जातिवंत कलावंत कोणत्याही क्षेत्रात गेला, तरी त्याचा औचित्यविवेक सजग असला पाहिजे, तरच त्याला अर्थ येतो. पत्रकाराच्या ठिकाणी केवळ मजुकराचा आशय-विषयाबाबत नव्हे, तर प्रथमदर्शनी दृश्यात्मक रचनाही यथातथ्य (जशी हवी तशी) असावी, हा विवेक आजही वृत्तपत्रसृष्टीत काम करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असाच आहे. १९२५ मधील अशीच एक घटना आजही वृत्तपत्रात काम करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरावी, अशीच आहे. बंगालचे तत्कालीन पुढारी बाबू चित्तरंजनदास यांचे दार्जिलिंगला अचानक निधन झाले. 'उशिरा 'च्या बातम्यांसह 'नवाकाळ'चा अंक छापून झाला होता. वर मोठ्या पावसाच्या बातमीखाली एक ओळ जेमतेम ही छोटी बातमी आली. उलट इतर वृत्तपत्रांतून चित्तरंजनदास यांच्याविषयी मोठ्या सविस्तर बातम्या, अग्रलेखही आले. हे दुसऱ्या दिवशी सकाळी काकासाहेबांच्या लक्षात येताच रात्रपाळीच्या संपादकावर ते संतापले. त्याला कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. अर्थात, रागाच्या भरात घेतलेला हा निर्णय त्यांनी संध्याकाळी फिरवला; पण रात्रपाळीच्या संपादकाने कितीही उशिरा बातमी आली, तरी ती विनाआळस नीट वाचून विवेकाने तिची दखल घेतली पाहिजे, हा धडा सहकाऱ्यांना दिला. वृत्तपत्र क्षेत्रातील अशा घटनांवरून त्यांचा स्वीकृत कार्याबद्दल निर्दोषपणाचा आग्रह, त्याची अंमलबजावणी करताना तन-मन-धनाची पर्वा न करणे आणि सहकाऱ्यांनाही ती शिकवण देत तयार करणे, असे किती तरी गुण दिसतात. आपण लिहिलेल्या संवादाचे नीट प्रक्षेपण नटाने करावे म्हणून नाटकांच्या तालमी करून 'वृत्तपत्रीय कार्य : केसरी ४१