Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या नावामुळे वाढला, अशी संकुचित टीका पूर्वी झालीच होती. आता 'नवा काळ' पत्राशी ‘टिळक' नावाचा दूरान्वयानेही संबंध नव्हता. उलट बदलत्या काळाची पावले ओळखून टिळकांचे द्रष्टेपण आणि म० गांधी यांची समयानुकूल राजनीती यांचे नाते नव्या काळाला अनुसरून खाडिलकर स्पष्ट करीत असल्याने लोकांचा पाठिंबा वाढत गेला आणि दुसरीकडे 'लोकमान्य'चा खप उणावत जाऊन त्यावर बंद पडण्याची वेळ आली. याचा बोध मात्र एककल्ली विचार करणाऱ्यांना घेता आला नाही, हे दुर्दैव! काळ बदलत होता हे खरेच आहे. आरंभी गांधीविचाराचे एकही वृत्तपत्र नसल्याने 'नवाकाळ' सुरू झाला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. हे खरे असले तरी, १९२४ मध्ये गांधी विचाराची दोन इंग्रजी सायंदैनिके निघाली. त्याचा परिणाम 'नवाकाळ'चा खप उणावण्यात झाला. तरीही 'नवा काळ' सर्वार्थाने नव्या काळाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला होता. लोकांच्या वाचकांच्या दैनंदिन गरजांचा भावनांचा मागोवा घेत इंग्लंडमधील वृत्तपत्रे विविध सदरे चालवीत होती, हे खाडिलकरांना माहीत होते. काम थोडे खर्चाचे होते, तरी कर्ज काढून ज्ञान, माहिती, मनोरंजन यांचा समावेश होईल, अशी सदरे त्यांनी सुरू केली. त्यात चित्रांचे स्थान मोठे होते. ग्रंथ आणि ग्रंथकार म्हणजे हल्लीच्या भाषेत पुस्तक-परीक्षणे, क्रीडा, व्यायाम, शेतकी, फार काय आठवड्यातून दोन वेळा गोष्टी (कथा ), संकीर्ण समालोचनात्मक लेखन अशी मजकुरात विविधता आणली. त्यासाठी विविध सदरे विविध वारी येतील, असे वेळापत्रक तयार केले. नवीन पिढीची अभिरुची लक्षात घेऊन क्रिकेटच्या चौरंगी सामन्यांची चटकदार इतिवृत्ते छापली. क्रिकेटविषयी लिहिणाऱ्या समालोचकाने आज क्रिकेटमध्ये प्रचलित झालेले किती तरी मराठी शब्द घडवून प्रचारात आणले, असा मोघम उल्लेख समकालिनांनी केला आहे. वृत्तपत्राची साप्ताहिक आवृत्ती हे एक मोठे आकर्षण असते. १९२५ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर 'नवा काळ' ची साप्ताहिक आवृत्ती सुरू केली. या पहिल्या अंकाच्या छपाईच्या संदर्भातली एक आठवण मोठी उद्बोधक आहे. या अंकाच्या मधल्या पानावर (अग्रलेखाच्या पानावर) देण्यासाठी तो अंक जास्त खपणार या कल्पनेने एका व्यापाऱ्याकडून 'मोठी' (अर्थात जाहिरातीचा दरही मोठा) जाहिरात मॅनेजरने स्वीकारली आणि अग्रलेखाच्या पानावर ती लावली. दोनशे अंक छापले जात असतील-नसतील, तोच काकासाहेब कारखान्यात आले. अंकावर नजर टाकली आणि 'छपाई बंद करा' असे ओरडून सांगितले. ही जाहिरात या पानावर का घातली, याची चौकशी केली असता मॅनेजरने खुलासा केला. तेव्हा ४० । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर