________________
राष्ट्रीय क्षितिजावर म० गांधी यांचे आगमन झाले होते. राजकारणात काही व्यक्तींचे येणे-जाणे हे केवळ एका व्यक्तीचे येणे-जाणे नसते. ती व्यक्ती आपली वृत्ती आणि विचारधारा घेऊन येत असते आणि जनता जेव्हा त्या व्यक्तीला स्वीकारते, तेव्हा तो स्वीकार त्या व्यक्तीच्या विचारधारेचा आणि वृत्तीचा असतो. टिळकांच्या मृत्यूनंतर म० गांधी यांचे येणे हे केवळ दोन व्यक्तींचे जाणे-येणे नव्हते; तर जनमानसाने त्या व्यक्तींच्या समजून ज्या विचारधारा आणि वृत्ती स्वीकारल्या होत्या, त्यांचा एक परिणाम होत होता. टिळकांच्या निधनामुळे महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले, तर सामाजिक आणि विशेषतः राजकीय नेतृत्वाच्या केंद्रावरून पुणे पुसट झाले. त्यातून एक असंतुष्ट विरोधी वृत्ती निर्माण झाली की काय, असे आता दूरस्थ राहून पाहताना वाटते. टिळकांच्या निधनानंतर नागपूरला भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनावर पूर्णपणे म० गांधी यांचा ठसा होता. गांधी यांच्या असहकारिता तत्त्वाचा प्रभाव जनमानसात वाढत होता. त्यामुळे या नागपूर अधिवेशनात म० गांधी यांनी मांडलेला असहकारितेचा ठराव बहुमताने पास झाला. त्यामुळे टिळकप्रणीत जहाल समजल्या जाणाऱ्या राजकारणाची पीछेहाट होत आहे, असे वाटणाऱ्या टिळक भक्तांचा एक मोठा असंतुष्ट गट काँग्रेसमध्येच होता. म० गांधी यांना निष्प्रभ ठरविण्यासाठी बंगालचे बाबू चित्तरंजनदास यांच्या नेतृत्वाखाली खास एक ट्रेन भरून माणसे अधिवेशनाला नेण्यात आली होती; परंतु म० गांधी यांना अभूतपूर्व असा पाठिंबा मिळून असहकारितेचा ठराव पास झालाच. मात्र पुढील एक-दीड वर्षांत गांधी यांचे सत्याग्रहाबाबत धोरण धरसोडीचे आहे, असे बऱ्याच लोकांना वाटले. वल्लभभाई यांच्या पुढाकाराने बार्डोलीच्या सत्याग्रहाची तयारी झाली, तरी चौरीचुरा येथे दंगे झाले, तेव्हा बार्डोलीचा सत्याग्रह गांधी यांनी रहित केला. त्यामुळे गांधी यांच्याविषयीचा विश्वास डगमगू लागला. त्यामुळे आधीच गांधींच्या विरोधात असलेल्या काँग्रेसवाल्यांनी गांधी यांचे अनुयायित्व सोडण्याचा विचार सुरू केला. गांधी यांनी कायदेमंडळावर बहिष्कार पुकारला होता. त्याला हा गट विरोध करू लागला. उलट कायदेमंडळात प्रवेश करण्याचा ठराव काँग्रेसकडून पास करून घेण्याच्या मताचा रेटा वाढू लागला. महाराष्ट्रात या भूमिकेचा जोर होता. हा 'फेरवाला' गट म्हणून ओळखला जाऊ लागला. याउलट गांधीमार्ग योग्यच आहे. इतकेच नव्हे, तर लो. टिळकांचेच बहिष्काराचे आणि स्वदेशीचे सूत्र घेऊनच गांधी यांचे राजकारण चालू आहे. गांधी यांचा असहकारितेचा मार्ग योग्य आहे, असे मानणारा अनेक महाराष्ट्रीय पुढाऱ्यांचा गट होता. जनसामान्यांचा पाठिंबाही वाढत होता. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर वृत्तपत्रीय कार्य : केसरी ३७