Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'केसरी'तून बाहेर पडले. टिळकांच्या मृत्यूवरचा शोकलेख हा 'केसरी'तील काकासाहेबांचा अखेरचा लेख ठरला. मात्र काकासाहेब वृत्तपत्रापासून दूर राहू शकत नव्हते. ज्या लो० टिळकांचा हात धरून काकासाहेब 'केसरी'त आले होते, तो 'केसरी' सुटला, तरी लोकमान्यांचाच ध्येयवाद घेऊन मुंबईला एक स्वतंत्र वृत्तपत्र काढायचे काकासाहेब खाडिलकरांनी ठरवले. वृत्तपत्रीय कार्य : ‘लोकमान्य' आणि 'नवाकाळ' मुंबईला राष्ट्रीय पक्षाच्या विचारांचे दैनिक चालावे यासाठी यापूर्वी प्रयत्न झाले होते. १९०८ मध्ये 'राष्ट्रमत' दैनिक सुरू झाले होते; परंतु आधीच डळमळीत आर्थिक पायावर उभे राहिलेल्या 'राष्ट्रमत'ला लो० टिळकांच्या कारावासामुळे अधिकच अडथळे आले आणि जेमतेम दीड वर्षे चालून ते बंद पडले होते. अच्युतराव कोल्हटकरांनी 'संदेश' पत्र सुरू केले होते; परंतु लो० टिळकांच्या राष्ट्रवादाशी ठाम संवादी मते नसल्याने त्याचा भरवसा वाटेना. अशात पुन्हा १९१९ पासून अशा एखाद्या वृत्तपत्राची चर्चा चालू असताना टिळकांचे निधन झाले. काकासाहेब ‘केसरी'तून बाहेर पडले. ही संधी समजून काही टिळक पक्षीयांनी 'लोकमान्य पब्लिशिंग कंपनी' ही संस्था मुंबईला चालू केली आणि आता खाडिलकर मोकळे झालेच आहेत, तर 'लोकमान्य' या नवीन वृत्तपत्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी असे ठरले. त्यानुसार काकासाहेबांना विचारले असता त्यांनी होकार दिला आणि वृत्तपत्रसृष्टीत 'पुनश्च हरि ॐ' करीत ९ मार्च १९२१ ला ‘लोकमान्य’चा पहिला अंक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या संपादकत्वाखाली प्रकाशित झाला. पगार ठरला ५००/- रुपये महिना तरी काकासाहेब प्रत्यक्षात ३००/- रुपयेच घेत. काम सुरू झाले. खाडिलकरांना आता मुंबईला स्थलांतर करावे लागले होते. खाडिलकरांचे 'सं० द्रौपदी' नाटकाचे प्रयोगही सुरू झाले होते; तरी 'लोकमान्य'वर आता अधिक लक्ष केंद्रित झाले. वृत्तपत्राचा खप वाढत होता. २०,००० पर्यंत पोहचलेला 'लोकमान्य' चा खप हा त्या काळातला उच्चांक होता. मात्र 'लोकमान्य' मध्येही फार काळ राहण्याचा योग नव्हता, असेच पुढे सिद्ध झाले. लोकमान्यांच्या निधनानंतर (१ ऑगस्ट १९२०) महाराष्ट्राच्या आणि एकूणच भारतीय राजकारणात खूप मोठे बदल झाले. पहिले महायुद्ध संपताच टिळकांच्याच हयातीत वसाहतीचे स्वातंत्र्य इंग्रजांनी द्यावे, ही मागणी झाली होती. भारताच्या ३६ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर