Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'केसरी' सुटला, नाटकं लिहिणंही जमणार नाही असं वाटलं, तर मी कीर्तनकाराचा पेशा पत्करीन. कारण हरिकीर्तनाचा पेशादेखील लोकजागृतीचाच आहे. परमार्थाने बोलायचे तर कीर्तन हे नाट्याचे आदिरूपच आहे. विशेषतः पौराणिक नाटकाचे ! ' कीर्तनकाराचा पेशा स्वीकारण्याचे त्यांनी त्या काळात इतके मनावर घेतले होते की, कीर्तनकाराला किमान संगीताचे ज्ञान असावे, गाणे गाता यावे, म्हणून त्यांनी संगीत शिकण्याचाही काही काळ प्रयोग केला. अर्थात कीर्तनकाराचा पेशा करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. त्या अवधीत अनेक नाटके लिहून झाली. त्यांचे प्रयोगही बऱ्यापैकी झाले. काही नाटके खूप गाजली. नाटकांद्वारे काकासाहेब लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचेच कार्य करीत होते. याचा पुरावा म्हणजे 'कीचकवध' (१९०७) या नाटकावर १९१० मध्ये सरकारने बंदी आणली. या नाटकामुळे लोकांमध्ये असंतोष वाढतो, हे कारण सरकारने दाखविले होते. नाटकांविषयी पुढे सविस्तर विचार करावयाचा आहे; परंतु काकासाहेबांच्या एकूण उद्दिष्टांसाठी नाटकही कसे प्रेरक ठरले, एवढीच नोंद येथे करायची आहे. त्याकाळात नाटक कंपनी बहुधा आपला नाटककार निश्चित करी. दिग्दर्शक ह संकल्पना अजून पुरेशी स्पष्ट नव्हती; मात्र कोणी तरी जाणकार नाटक बसविण्याचे आणि तालमी घेण्याचे 'तालमी मास्तर'चे काम करी. खाडिलकर आपल्या नाटकांचे दिग्दर्शनही स्वतः करीत आणि त्यात स्वतःचे स्वतंत्र कौशल्य दाखवीत, अशा आठवणी सांगितल्या गेल्या आहेत. म्हणूनच दुसऱ्यांदा नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळणे, हा त्यांचा नैतिक हक्क होता. जून १९१४ मध्ये टिळकांची मंडालेच्या कारावासातून सुटका झाली. नागरिकांनी टिळकांचा भव्य सत्कार केला. 'केसरी', 'मराठा' तोपर्यंत केळकर पाहत होते. टिळक परत आल्यानंतर मात्र खाडिलकर पुन्हा 'केसरी'त आले, ते अत्यंत आनंदाने! टिळकांच्या आगमनानंतर मध्यंतरीच्या काळातले मळभ विसरून काकासाहेबांनी 'केसरी' चे काम सुरू केले. टिळकही नव्या उत्साहाने आपली 'जहाल' भूमिका घेऊन कार्यरत झाले. 'नवा काळ, नवं कार्य' हा संदेश 'केसरी'तून लोकांपर्यंत पोहचू लागला. टिळक मंडालेला जाण्यापूर्वीच सुरत येथे भरलेल्या काँग्रेसमध्ये भाऊबंदकी होऊन जहाल- मवाळ असे सरळ विभाजन झाले होते. काँग्रेसवर जहालांचे पर्यायाने टिळक पक्षाचे- वर्चस्व स्थापन झाले होते. आता मंडालेहून आल्यानंतर जहाल-मवाळ, मुसलमान या सर्वांचे ऐक्य व्हावे, यासाठी टिळकांचे प्रयत्न सुरू झाले. कारण परकीय इंग्रज सरकारच्या ३४ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर