________________
सुधारणांकडे अधिक होता, हे प्रसिद्धच आहे; मात्र त्यामुळे एखाद्या सामाजिक प्रश्नावरून 'सुधारक' आणि 'केसरी' मधील वाद-प्रतिवाद रंगू लागले. या काळात म्हणजे १८८८ पासून असे वाद वाढत गेलेले दिसतात. १८९० मध्ये पंचहौद मिशनचा वाद, संमती कायद्यासंबंधी वाद, १८९२ मध्ये पं० रमाबाई यांच्या 'शारदासदन' या स्त्रीशिक्षण संस्थेला विरोध, १८९४ पासून सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यासंबंधी जनजागरणपर लेखन हे चालूच होते. १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली होती. C १८८९ मध्ये टिळकांनी रीतसर काँग्रेस प्रवेश केला आणि वार्षिक अधिवेशनांना उपस्थित राहून ते आपली भूमिका ठामपणे मांडू लागले होते. अशात १८९५ च्या काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक सुधारणाविषयक अधिवेशनाला जोरदार विरोध टिळक पक्षीयांकडून झाला आणि राजकीय व सामाजिक परिषद स्वतंत्रपणे आपली अधिवेशने भरवू लागल्या होत्या. सामाजिक सुधारणांना अग्रक्रम देणाऱ्यांना ' मवाळ' आणि राजकीय सुधारणांना अग्रक्रम देणाऱ्यांना 'जहाल', अशी बिरूदे दिली गेली. लो० टिळक हे स्वाभाविकच 'जहाल' पंथीयांचे नेते ठरले होते आणि अनेक बाबींमध्ये जहाल- मवाळ मतभेद हिरिरीने मांडले जाऊ लागले होते. यातच टिळकांचे ताईमहाराज प्रकरण, कोल्हापूरचे वेदोक्त प्रकरण आणि त्या संबंधीचे खटले आणि वाद यांची वृत्तपत्रांतून जोरदार चर्चा होत होती. 'केसरी' अतिशय आक्रमकपणे प्रतिपक्षीयांचे वाभाडे काढीत असे. सर्व- सामान्य वाचक- विशेषतः तरुण वाचक 'केसरी'कडे ओढला जात असे आणि राष्ट्रीय बाण्याचे मुखपत्र म्हणून 'केसरी' ओळखला जात असे. स्वातंत्र्य मिळवणे आणि त्यासाठी इंग्रज सरकार आणि इंग्रजांबद्दल आस्था बाळगणारे यांच्याशी जणू 'केसरी'चे शत्रुत्व आहे, अशी भावना समाजमनात निर्माण होत असे. खाडिलकरांचे लेखनही प्रतिपक्षीयांचे वाभाडे काढणारे असे. त्याबाबत 'मराठा'चे संपादक न० चिं० केळकरांशी त्यांचे मतभेदही होत. अशा राजकीय अशांततेत १९०५ मध्ये लॉर्ड कर्झन यांनी जाहीर केलेल्या ' वंगभंग' नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेल्या 'बंगालची फाळणी' प्रकरणाने देशभर असंतोष पेटला. टिळक या फाळणीविरोधात आक्रमकपणाने बोलू-लिहू लागले आणि ते केवळ महाराष्ट्राचे पुढारी न राहता राष्ट्रीय पुढारी झाले. 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून ते प्रसिद्ध झाले. महाराष्ट्राचे बाळ गंगाधर टिळक, पंजाबचे लाला लजपतराय आणि बंगालचे चित्तरंजन पाल ही 'बाल-लाल-पाल त्रिमूर्ती' स्वातंत्र्यलढ्यात लोकप्रिय झाली. वृत्तपत्रीय कार्य : केसरी । ३१