________________
टिळक तुरुंगातून सुटले आणि 'पुनश्च हरि ॐ' या शीर्षकाचा सुप्रसिद्ध लेख त्यांनी लिहिला. त्यात टिळकांनीच ही बाब उघड केली आहे. खाडिलकरांची एलएल० बी० च्या पहिल्या वर्षाची परीक्षा झाली होती. दुसऱ्या वर्षाची परीक्षाही खाडिलकरांनी द्यावी, असा टिळकांचा आग्रह होता. कारण खाडिलकर पूर्ण एलएल० बी० नव्हते. न० चिं० केळकर होते. म्हणून १८९७ मध्ये टिळक तुरुंगात गेल्यावर 'केसरी'चेही अधिकृत संपादक केळकरच झाले. 'मराठा'चे ते संपादक होतेच. अर्थात केवळ एखादी पदवी परीक्षा उत्तीर्ण होण्याने किंवा न होण्याने सकस पत्रकाराच्या गुणवत्तेत फरक पडत नाही, हे टिळकांनाही माहीत होते. अखेर टिळकांनीच १९०० मध्ये त्यांना मुंबईला पाठवले. १९०२ पर्यंत ते बराच काळ मुंबईत होते. काही कारणाने 'केसरी'त काम करणे शक्य झाले नाही (बंद पडल्याने), तर उदरनिर्वाहाची सोय असावी, असेही धोरण होते. तरी मुंबईलाही लेखनाखेरीज खाडिलकरांना चैन पडेना. या काळात दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिश-बोअर युद्ध सुरू झाले होते. त्या युद्धाचा खाडिलकरांनी बारकाईने अभ्यास सुरू केला. जगाच्या पाठीवर इंग्रजांची सत्ता कोठे कशी खिळखिळी होत आहे, याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे. युद्धकाळातील रोजच्या घडामोडींच्या वार्ता ते केसरीसाठी पाठवीत. १९०२ मध्ये युद्ध संपल्यावर खाडिलकरांनी जूनच्या उत्तरार्धापासून ऑगस्ट अखेरपर्यंत 'गनिमी काव्याची लढाई या शीर्षकाने एकूण नऊ लेख लिहिले. याच काळात टिळक ताईमहाराज खटल्यात गुंतले होते. वरील लेखमालेत शेवटचा समारोपाचा एक लेख टिळकांच्या सूचनेवरूनच त्यांनी लिहिला होता; पण पुन्हा त्यातून टिळकांवर राजद्रोहाचा आरोप कदाचित सरकार करील असे कायदेपंडित स्नेही दाजी आबाजी खरे यांचे मत पडल्यामुळे तो लेख रद्द केला. १९०३ ते १९०५ या काळात काकासाहेब नेपाळात गेले होते. स्वाभाविकच त्यांचे केसरीतले लेखन बंद होते. घरावरील कौले तयार करण्याचे तंत्र शिकणे, खाडिलकरांचे नेपाळला जाण्यामागचे दृश्य उद्दिष्ट होते. त्यानंतर आगकाडीच्या पेट्यांचा कारखाना काढण्याचे एक कारण पुढे आले. ती कल्पनाही प्रत्यक्षात आली नाही. . वस्तुतः हत्यारांचा कारखाना काढणे, हे त्यामागे उद्दिष्ट होते. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाट्यक्षेत्रातील कर्तृत्व आणि झुंजार पत्रकार म्हणून त्यांची कारकीर्द सर्वज्ञात आहे; मात्र सशस्त्र क्रांतीच्या वाटेने जाण्याचा त्यांच्या प्रयत्नांचा पुसटसा उल्लेख केला जातो. 'नेपाळ प्रकरण' म्हणून ते काहीसे गूढत्वच राहिले आहे. यापूर्वीच्या चरित्रकारांनी काहीसा तपशील दिलेला आहे, नाही असे नाही; पण आता त्या घटनेस पाऊणशे वर्षे उलटून गेल्यानंतर २४ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर