________________
१ वृत्तपत्रीय कार्य : केसरी सप्टेंबर १८९६ पासून ते १९०९ च्या डिसेंबर अखेरपर्यंत खाडिलकर ‘केसरी-मराठा' वृत्तपत्रसमूहात होते. मध्यंतरी १९०२ ते १९०५ या काळाचा अपवाद ! कारण या काळात खाडिलकर कौलांच्या कारखान्याची विद्या शिकण्यासाठी टिळकांच्याच आदेशावरून नेपाळमध्ये गेले होते. १८९७ फेब्रुवारी ते एप्रिल या काळात पुण्यात प्लेगची साथ जोरात असल्याने त्यांचा मुक्काम सांगलीस होता. या अवधीत त्यांनी 'कांचनगडची मोहना' हे नाटक लिहिले. मे महिन्यामध्ये टिळकांनी तातडीने बोलावले म्हणून ते पुण्यास आले. या काळात श्री. न० चिं० केळकर 'मराठा'चे काम पाहत असत. खाडिलकर पुण्यास आले, त्यावेळी टिळक सिंहगडावर गेले होते. रविवार असून काकासाहेब केसरी कचेरीत गेले. तेव्हा मंगळवारच्या अंकाची काहीच तयारी नव्हती. काकासाहेब तत्परतेने कामाला लागले. टपाल पाहून काही मजकूर मुद्रणा- साठी दिला. शिवाजी उत्सव थोड्या दिवसांवर आला होता. लोकमनाची तयारी करण्यासाठी शिवाजी उत्सव आणि गणेशोत्सव जवळ आले की, लेख त्याच विषयावर लिहिण्याची टिळकांची पद्धत होती. ती लक्षात घेऊन कार्लाईलच्या 'हिरो अॅण्ड हिरोवर्शिप' या पुस्तकातील विचारांना अनुसरून 'विभूतिपूजा' शीर्षकाचा लेख खाडिलकरांनी लिहिला. त्या वर्षीच्या शिवाजी उत्सवातील 'केसरी'तील ज्या लेखनावर राजद्रोहात्मक लेखन म्हणून सरकारने शिक्का मारून टिळकांवर खटला भरला होता, त्यात खाडिलकरांच्या या लेखाची आणि स्फुट सूचना सदराखाली केलेल्या लेखनाची भर पडली. त्यातच २२ जून १८९७ रोजी रँड साहेबाचा खून झाला होता. टिळकांना तुरुंगवासाची शिक्षा झाली, तेव्हा 'केसरी'चे संपादकपद अधिकृतपणे केळकरांच्या नावावर असले, तरी प्रत्यक्ष सर्व कामे खाडिलकर पाहत होते. विशेषतः या काळातले अग्रलेख पाहिले की, टिळकांच्या संपादकीय व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. म्हणून वाचकांनाही टिळकांची उणीव भासत नसे. १८९९ मध्ये वृत्तपत्रीय कार्य : केसरी / २३