________________
झाली. त्यांनीच पुढे सांगितल्यानुसार, 'पुराणकथा कल्पनेने फुलवीत नेण्याच्या कौशल्याचा संस्कारही आईकडून अभावितपणे झाला होता. ' त्याचे फलित म्हणून एक प्रतिभासंपन्न पौराणिक नाटककार पुढे महाराष्ट्राला मिळाला. एका परीने प्रतिभेचे स्तन्य या लेखकाला आईकडून मिळाले आणि बालपणीच्या उपेक्षेची दामदुपटीने भरपाई झाली. खाडिलकरांचे प्रारंभीचे मराठी शिक्षण सांगलीच्या विष्णुघाटावरच्या दादा छापखाने यांच्या शाळेत झाले. अभ्यासात हुशार पण अतिशय हूड म्हणून या मुलाची ख्याती होती. हस्ताक्षर आणि गणित या त्या काळात आवश्यक मानलेल्या विषयांचे शिक्षण या शाळेत चांगले दिले जाई. सांगलीच्या कृष्णा नदीत पोहणे, ही सांगलीच्या मुलांसाठी अजूनही आवश्यक मानली जाणारी गोष्ट, त्या काळात कृष्णाही सहाध्यायांसमवेत करीत असे आणि नंतर संध्याकाळी आट्यापाट्या, हुतुतू हे खेळही रंगत. बापाविना पोरका म्हणून त्याची कोणतीही आबाळ आईने पुढे होऊ दिली नाही; मात्र तिला संसाराचा गाडा ओढताना खूप कष्ट पडत. कृष्णाचे वडील दत्तभक्त होते. आईही दत्तभक्तीत विरंगुळा शोधत राही. पुराणश्रवण हा त्या काळात स्त्रियांना मोठा विरंगुळा असे. कृष्णाची आई मनापासून पुराण ऐके; मात्र पुराणिकबुवांचे पुराण ऐकण्यात कृष्णाचे मन रमत नसे. त्याऐवजी आईच्याकडून तिने रंगवून सांगितलेल्या पुराणकथांमध्ये लहानगा कृष्णाही रमून जात असे. त्यासंबंधी काकासाहेबांनी लिहिले आहे की, 'आई ज्या वेळी पुराणाच्या गोष्टी सांगे, त्यावेळी मूळ कथेत कुठे काही अस्पष्टपणा असला किंवा न्यून असले, तर रसाळपणाच्या जोरावर ती ते सगळं भरून काढीत असे. काव्याचे संस्कार त्यामुळे माझ्या मनावर झाले. आईने केलेल्या रसभरीत वर्णनात त्याचा उगम आहे. ' याच काळात हायस्कुलात शिकत असताना नाटके पाहण्याचा त्यांचा नाद वाढत होता. त्याकाळी सांगलीला कुंटेवाड्याच्या मोठ्या चौकात किंवा जुन्या मुरलीधराच्या देवळात नाटके होत. तीही बहुधा पुराणकथांवर आधारलेलीच असत. विष्णुदासांचे नाटक पुण्यामुंबईला तिकीट लावून सुरू झाल्यानंतर म्हणजे १८५३ नंतर तिकडे ऐच्छिक दानाचे आरतीचे तबक बंद झाले होते. तरी खाडिलकरांच्या बालपणीच्या या नाटकांना ' तिकीट वगैरे काही नसे; पण सूत्रधाराच्या शेजारी एक मोठं ताम्हन किंवा ताट ठेवलेलं असे. त्यात वाटेल त्यानं मनाला येईल ती रक्कम टाकावी. चिल्लरीनं कधी घागरही भरून जात असे, अशी आठवण सांगितली जाते. या सर्वांचा परिणाम संस्कारक्षम वयातल्या शाळकरी कृष्णावर झाला नसता, तरच आश्चर्य होते. त्यावेळच्या इंग्रजी तिसरीत (हल्लीच्या सातवीत) असताना बालपण आणि जडणघडण १९