Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेवढेच नव्हे, तर हिंदी, बंगाली, कानडी वगैरे सर्व देशी भाषांचे संरक्षण केले ! 'जगा'चे रक्षण गुरूंनी केले, अशा आशयाचे जे उद्गार ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ग्रंथाच्या अखेरीस प्रेरणेचे विवेचन करताना काढले आहेत, त्याचा अर्थ वरील तऱ्हेचा आहे. समाधिधनाशिवाय म्हणजे आपल्या कार्यातच पूर्णपणे गुंग होऊन इतर सर्व परिग्रहाचा त्याग केल्याशिवाय आणि बहुजन समाजास जागृत करण्याचे आपले कार्य आजन्म चोहोकडे एकसारखे फिरत राहून संकीर्तनाच्या मार्गाने करत राहिल्याशिवाय, म्हणजे लोकसंग्रह करण्याचा उपाय योजल्याशिवाय, आणीबाणीच्या प्रसंगांतून म्हणजे अपमृत्यूच्या व महामृत्यूच्या भयातून बहुजन समाज पार पडू शकत नाही, हीच शिकवणूक मराठी भाषेची आई सर्वांना शिकवत आहे ! लोकसंग्रहाकरता जागृतीचा फैलाव करण्याची चळवळ मराठी भाषेने जशी परिणत स्थितीत आणली आहे, तशी महाराष्ट्राबाहेर इतर ठिकाणी दृष्टीस पडत नाही. ज्ञानेश्वरांमागून एकनाथांनी पंढरीच्या संप्रदायास नागरपणाचा नवा पोशाख चढवून मुसलमानी अमदानीत फैलावाच्या या मार्गाला अधिक जोर आणला. एकनाथांचे गुरु जनार्दनस्वामी दत्तात्रय संप्रदायातील होते. त्यावेळच्या दीक्षाकारांच्या दीक्षा म्हणजे गुरुमंत्र द्यावयाचा आणि फैलावाच्या कामाला लागणारे पुरुष एकविचाराने भरून काढून लोकजागृतीकरता त्यांचे मठ किंवा अड्डे किंवा नुसत्या एकट्या व्यक्ती चोहोकडे विखरून टाकणे, अशा स्वरूपाचा दीक्षाकारांच्या लोकसंग्रहाच्या चळवळीचा त्या वेळचा मार्ग होता. चैतन्य, तुळशीदास व कबीर यांनी उत्तरेस जे कार्य केले, तेच कार्य नामदेव-तुकाराम यांच्यासारख्या प्रमुख संतांनी महाराष्ट्रात केले. वारकऱ्यांच्या माळेची दीक्षा सर्व जातींना देऊन पंढरीच्या वारकऱ्यांत ते प्रमुख दीक्षाकार झाले. मराठी भाषेतील अभंगांच्या द्वारे चोहोकडे जिवंतपणाचा फैलाव करावयाचा व कोणासही मरू द्यावयाचे नाही, असा वारकऱ्यांच्या दीक्षेचा कटाक्ष आहे. चोहोकडे फिरून कीर्तन करणे, हा तुकाराम महाराजांचा मुख्य व्यवसाय ! या व्यवसायाच्या गुंगीत व आनंदातच त्यांच्या हातून अभंग रचले जात व त्या अभंगांमध्ये त्यांच्या व्यवसायातील सर्व गोडी समाधिधन म्हणून ओतली गेल्यामुळे संस्कृताप्रमाणेच त्यांचे अभंग आपोआप 'अमर-अमृत' होत. कधीही न मरणारे व न मेलेले अशी स्थिती प्राप्त होण्यास लोकसंग्रहाकरता करावयाच्या फैलावाच्या या मार्गाशिवाय दुसरा मार्ग किंवा निष्ठा नाही! या मार्गात साधनांची किंवा द्रव्याची अपेक्षा नाही! कोठेही उभा राहून परमेश्वराच्या नावाचे भजन करावयाचे आणि नंतर जमलेल्या मंडळींना उपदेश करावयाचा, असा हा चळवळीचा मार्ग आहे. एकटा पुरुष तन्निष्ठ झाला म्हणजे त्याला दाही दिशा मोकळ्या, अशी ही शक्ती आहे. परिशिष्ट - ३ / १३५