________________
परिशिष्ट - ३ साहित्य संमेलन — अध्यक्षीय भाषण (१९३३) स्वागताध्यक्ष कुलगुरु श्री भवानीशंकर नियोगी, संमेलनाचे प्रतिनिधी व मराठी भाषेच्या अभिमानी बंधू-भगिनींनो, नागपूर येथील मराठी साहित्य संमेलनाच्या १८व्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मला देऊन आपण जो माझा बहुमान केला आहे, त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. नागपूरचे महत्त्वाचे केंद्रस्थान नागपूर- वऱ्हाड म्हणून मराठी भाषेचा जो प्रांत समजला जातो, तो प्रांत संस्कृत भाषेतील काही प्रसिद्ध ग्रंथकारांची जन्मभूमी या नात्याने पवित्र आहे. इतकेच नव्हे, तर पुराणातील काही प्रसिद्ध राजघराण्यांचे निवासस्थान म्हणूनही नामांकित आहे. संस्कृत भाषेस या प्रांताने जशी मदत केली आहे, तशीच मदत 'प्राकृत महाराष्ट्री' भाषेसही केलेली आहे. पाली, अर्धमागधी व शूरसेनी या प्राकृत भाषांचे अपभ्रंश होऊन आस्ते आस्ते बनलेल्या हिंदी, बंगाली व मराठी भाषांचे संमेलनही नागपुरात केंद्रस्थान या नात्याने झालेले आहे. मराठेशाहीतील नागपूरचा प्रचंड उद्योग, मराठीला पूर्वेस कलकत्त्यातील बंगालीजवळ नेऊन ठेवण्यास आणि हिंदी व मराठी यांना एकमेकींशी सलगीने मिसळून टाकण्यास कारणीभूत झालेला असल्यामुळे, नागपूरला मराठी भाषेच्या दृष्टीने ग्वाल्हेरहून अधिक महत्त्व आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणी मराठी भाषेत अतिचपलतेने मुलुखगिरी करणारा एखादा धाडसी लेखक अध्यक्षस्थानी असता तर अधिक बरे झाले असते. मुंबई प्रांतात मराठी बोलणाऱ्यांची संख्या सर्वात जरी मोठी आहे आणि मुंबई शहर जरी महाराष्ट्राचा भाग म्हणून गणले जात आहे, तरी मराठी भाषेला शहराच्या कर्तबगारीत आणि लौकिकात काहीच मान नाही. दुबळ्या व हलक्या स्थितीत आम्ही मराठी लेखक तेथे आहोत. आमची भाषा म्हणजे ताटाखालच्या मांजराची भाषा मुंबईस आहे. मुंबई १३० । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर