Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हरिदासांना कार्य करून दाखवता येणार नाही. सुशिक्षित लोक राजकारणाचा जो विटीदांडूचा खेळ खेळत आहेत, त्यात हरिदासांनी प्रत्यक्ष भाग जरी न घेतला, तरी सावलीत बसून खेळ कसा चालला आहे, कोणाची सरशी होत आहे, हे कौतुकपूर्ण दृष्टीने मात्र पाहिले पाहिजे. राजकारणाविषयी उदासीन राहून मात्र चालणार नाही. हरिदासांनी दुसन्या धर्माच्या हालचालीकडेही सेनानायकासारखे लक्ष पुरवले पाहिजे. दक्षता राखली पाहिजे. रामदास स्वामींनी शिवरायाला सांगितले होते की 'तुला परमेश्वराची मदत आहे पण सावधपणा ठेवला पाहिजे.' चतुरपणाने 1. सुशिक्षितांचे मनोगत ओळखून, त्याला वेसण घालून परमेश्वरी कार्याकडे लावणे, हेच हरिदासाचे कार्य आहे. बुद्धी ही मनाच्या वरची स्थिती आहे. इंद्रियांमधला सापेक्षपणा ती पाहात असते. मनाच्या ठिकाणी सर्व शक्ती आहे. 'इंद्रियाणां मनश्चस्मि,' असे गीतेत सांगितले आहे. मन वाईटही आहे, त्याप्रमाणे चांगलेही आहे. मनाच्या यंत्रावर आरूढ होऊनच परमेश्वर कार्य करत असतो, असे गीतेत सांगितले आहे. भक्ताच्या मनात शिरण्याचा मार्ग सापडावा म्हणून परमेश्वर भक्ताभोवती घिरट्या घालत असतो, याचा विचार करा. सूक्ष्म विचार करा, एकांत सेवा, अखंड चालना करा, परमेश्वर बुद्धीला केव्हा तरी गती देईलच. बुद्धी एकाग्र होऊन प्रफुल्ल होते. बुद्धी प्रफुल्ल झाली की, तिथे परमेश्वर शिरलाच म्हणून समजा. कुशाग्र बुद्धीचे महत्त्वही एवढ्याच करता आहे. एकदा बुद्धी कुशाग्र झाली, तेथे परमेश्वराचे अधिष्ठान झाले की, चांगले बोलावे कसे, लिहावे कसे हे सर्व सुचते. सुचले सुचले म्हणजे काय ? ते कसे सुचले ? कोठून सुचले ? पाश्चात्त्यांनी अजून या सुचण्याची उपपत्ती लावली नाही. सुचले म्हणजे काय झाले, हे त्यांना सांगता येणार नाही. हे आपल्या तत्त्वज्ञानात आहे. सुचले म्हणजे परमेश्वराने प्रेरणा केली. लोकांची मनोगतेही आकर्षून घेण्याची आपल्यात शक्ती उत्पन्न होते. लोकांची मनोगते कशी आकर्षण करावी, हे शिकायचे असल्यास लोकमान्य टिळकांचा 'गीतारहस्य' ग्रंथ पाहा. पूर्वीचेच विचार नवीन शब्दांनी कसे नटवावे हे व त्याच- प्रमाणे भाषेचा तार्किकपणाही त्यात पूर्ण दाखवून दिला आहे. श्री शिवरायाच्या काळास जसा ‘दासबोध' तसाच 'गीतारहस्य' हा ग्रंथ आधुनिक काळास अनुसरून आहे. हे लक्षात बाळगून त्याचा अभ्यास करा. ते शस्त्र सुशिक्षित लोकांची मने वळवण्यास फार उपयोगी पडेल. मनाला आकर्षून घेण्यासाठीच गायनाचे कीर्तनात महत्त्व आहे. गाण्याचा महिमाच असा आहे की, ते तार्किकांनाही आपणाकडे ओढून घेते. गायनाच्या केवळ कलेकडेच लक्ष पुरवून कलावान होऊन मात्र राहू नका. १२८ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर