________________
हरिदास व राष्ट्रीय कार्यकर्ते हरिदास व राष्ट्रीय सभेचे चळवळे लोक यात एक प्रकारचे साम्य आहे. राष्ट्रीय सभेत कार्याची दिशा ठरवणारे महात्मे व त्यांच्या भोवती गोळा होणारे मजसारखे चळवळे लोक असतात. धर्मासंबंधीही तीच स्थिती आहे. महंत, साधू वगैरे परमेश्वर कृपेचे साठे यांचे काम निराळे व त्यांच्या चेल्यांचे कार्य निराळे असते. कीर्तन संप्रदायातही अशी महंत मंडळी आहेत; पण हा जो २००-३०० हरिदासांचा पसारा आहे, हा धार्मिक चळवळ्यांचा होय. हरिदासांसारखे धार्मिक चळवळे व मजसारखे राजकीय चळवळे या दोघांनी एकत्र होऊन एकमेकांची अडचण लक्षात घेऊन उभयतांचा मार्ग सोपा करणे, हेच आपणांस उचित होय. मुंबईच्या कीर्तन - संमेलनाच्या सहाव्या ठरावाकडे लक्ष दिले असता, वृत्तपत्रकार, लेखक व वक्ते यांनी या संप्रदायाकडे लक्ष पुरवून ठिकठिकाणी त्यांचा उल्लेख करावा व उत्तेजन द्यावे, हाच त्यातील हेतू दिसतो. आम्हा राजकीय चळवळ्यांचीही तीच स्थिती आहे. आमचा उल्लेख करावा, उत्तेजनपर दोन शब्द बोलून लोकाश्रय मिळावा व त्याने कार्यास हुरूप यावा, हाच आमचाही हेतू असतो. दुसराही एक महत्त्वाचा उल्लेख त्या ठरावात आहे. कीर्तनकारांची स्थिती खालावलेली आहे, त्यास उपाय काय, याची चर्चा करून त्या स्थितीचे निदान करावे, हीच ती महत्त्वाची गोष्ट होय. माझ्या मते याची तीन कारणे दिसतात. पहिले कारण सुशिक्षितांचे औदासीन्य, दुसरे रुचिवैचित्र्य, तिसरे दानपद्धतीसंबंधी अनास्था हे होय. या कारणांकडे व १५-२० वर्षांपूर्वीच्या राजकीय चळवळीकडे पाहिले असता त्या वेळेलाही आम्हाला असेच उद्गार काढावे लागत असत. अंतःकरणाला पीळ पाडून राजकीय प्रगतीकरता खटपट करावी, पण लोक मात्र उदासीन. १९०८ मध्येही हीच स्थिती होती. स्वदेशीचा उपदेश ऐकावा, पण अमलात मात्र आणू नये, अशी स्थिती होती. लोकांचे औदासिन्य आजही महात्माजींचा वकील वर्गावर रोष झाला आहे, याचे कारण त्यांची उदासीनता होय. इंग्रजी शिक्षणाने तयार केलेला माल (हा सुशिक्षितांचा वर्ग) देशकार्यात नेहमी उदासीन असतो. या बाबतीत आमची व तुमची स्थिती सारखीच आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये देशकार्यार्थ हजारो लोक प्राण देण्यास तयार असत, तेथेच आज उदासीनता पसरलेली दिसत आहे. पानिपतचे लढाईचे वेळी दीड लाख बांगडी फुटली, असे म्हणतात. एवढी प्रचंड शक्ती ज्या महाराष्ट्रामध्ये नांदत होती, त्याच १२६ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर