Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तत्त्वज्ञानी हा सत्य जाणतो, परमेश्वरी आनंदात तल्लीन होतो; पण तो वेदाभ्यासजड व 'विषयव्यावृत्त कौतुहल' असतो. तत्त्वज्ञान खुंटते, तर्कशास्त्र कुंठित होते, तेथेही कवीची प्रतिभा सत्यशोधन करते. हा कवी व तत्त्वज्ञानी यामधील फरक होय! आनंद हा तुडुंब वाहू लागला म्हणजे त्याला रसाची पातळ अशी 'वाहणारी ' अवस्था प्राप्त होत असते. या रसाचे कोणीही व कितीही जरी पान केले, तरी तो कमी न होता वाढतच असतो. कवी हा स्वतः संसारातील आनंद उपभोगून दुसऱ्याचा संसार आनंदमय करत असतो. राजसत्तेला व्यापून उरणारा कवी कवी हे मुख्यतः संसाराभोवतीच गुरफटलेले असतात. संसाराचे केंद्र म्हणजे राज्यव्यवस्था होय. राजाला कवी प्रिय असेल, तर तो कवीला आश्रय देतो; पण तोच अप्रिय असेल, तर तो कवीला घालवून देतो, त्याची पुस्तके जप्त करतो. मी हा जो राजा शब्द वापरला आहे, तो 'पंचम जॉर्ज' या अर्थी नव्हे; तर 'अधिकारी' या अर्थी आहे, हे पक्के ध्यानात ठेवले पाहिजे. कवीचे जीवित राजसत्तेच्या मर्जीवर अवलंबून असते. तिला एखादा कवी अप्रिय असला म्हणजे असे वाटू लागते की, ' हा कवी बोकांडी बसणारा पिशाच्च आहे!' मग ती मांत्रिक बोलावते व कवीच्या नाकात मिरच्यांची धुरी घालावयालाही कमी करत नाही. मी 'हा मिरच्यांचा धूर अनुभवलेला' मनुष्य आहे. कवीने जवळ जावे व राजाने दूर सारावे, अशी अप्रिय कवीची स्थिती होते. मी राजा असतो, तर मलाही एखादे वेळी असेच करावे लागले असते! तेव्हा अमूक एकावर मी दोष ठेवू इच्छित नाही. असे काही राजकारणाचे प्रसंग येतात की, त्या वेळी कवीची कितीही लाडकी व मुख्य अपत्ये असली, तरी राजसत्तेच्या निर्घृण वृत्तीला ती बळी पडतात. जेव्हा रूळ रस्त्यावरून फिरतो तेव्हा क्षुद्रांचा चुराडा व्हावयाचाच; त्यात रूळाला दोष देण्यात अर्थ नाही. 'बा रूळा, तू केवढा हा भक्कम, तू फार मोठा,' असेही म्हणून काही उपयोग नाही. ही क्षुद्रकणांची परीक्षेची वेळ असते. राजाची परीक्षा ज्याप्रमाणे रणांगणावर, त्याचप्रमाणे तांदळाची परीक्षा उखळात होत असते. मुसळाचे घाव बसत असतां जो तांदळाचा दाणा अखंड राहील, तोच तेजाला चढेल व त्याचेच मोल वाढेल ! कवी हा काही केल्या राजसत्तेच्या झाडाला सोडत नाही; तो मांत्रिकाला जुमानत नाही. त्याची प्रतिज्ञा असते की, 'रसाने मी राजाला भिजवून टाकीन. ' ब्रह्म जसे विश्वाला व्यापून दशांगुळे उरते, तसाच कवी हा राजसत्तेला व्यापून पुन्हा रंगभूमीवर प्रकट होतच असतो. रसामध्ये जो एक प्रकारचा वेग असतो, त्यामुळेच कवीमध्ये सामर्थ्य येत असते. अधिकाऱ्यांना किंवा राजाला बरे वाटत असो वा १२२ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर