Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जीभ वळेनाशी झाली. मेंदूवरही परिणाम झाला. पुढे प्रवचने करणे शक्य नव्हते. नृसिंहवाडीचे प्रवचन अखेरचे ठरले. पुढे दोनच वर्षांनी सूनबाई (अप्पासाहेबांच्या पत्नी सौ. कमलाबाई) दीर्घ आजाराने निधन पावल्या. पाठोपाठ धाकटा मुलगा विनायक याचाही मृत्यू झाला. अशात १९४३ मध्ये सांगलीला मोठ्या प्रमाणात नाट्यशताब्दी महोत्सव आयोजित केला होता. अशावेळी काकासाहेबांच्या जन्मभूमी सांगलीने त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते, तरी शारीरिक आणि मानसिक विकल अवस्थेत त्यांना येणे शक्य नव्हते. काकासाहेबांनी एक संदेश लिहून पाठविला. तो जाहीरपणे वाचला गेला. 'माझा जन्म सांगलीचा. नाटके पाहण्याविषयी माझी हौस इतकी होती की, इंग्रजी शाळेत गेल्यावर चार वर्षे दशावतार मंडळी सांगलीस आली असताना मी खेळास हजर राहिलो नाही, असे क्वचितच व्हायचे. मी इंग्रजी तिसरीत एक नाटक लिहिले होते. श्रीमंत राजे अप्पासाहेब यांनी कळकळीने आस्थापूर्वक सुचविल्या- प्रमाणे कवी विष्णुदास भावे यांच्या शतसांवत्सरिक उत्सवास आपण सर्व जमलेले असताना मी उत्सवात भाग घेण्यास आपखुशीने यावयास हवे होते; पण प्रकृती अस्वस्थ असल्याने मला हजर राहता येत नाही. मी नाटकी प्रथम आहे आणि पत्रकार मागूनचा आहे, हे विसरू नका. मी गैरहजर आहे म्हणून तुमचा राग नसावा. आपण या उत्सवास नेमलेले तीनही प्रसंगांचे स्वागताध्यक्ष आणि अध्यक्ष कर्तबगार असल्याने ते समारंभ उज्ज्वल कीर्तीनेच पार पाडतील, असे मला वाटते. हे माझे शुभचिंतन आहे. ' सांसारिक आपत्ती आणि देहाची विकलता पुढे वाढतच गेली. १९४५ च्या मार्चमध्ये आयुष्याची साथीदारीण गौरकाकू स्वर्गवासी झाल्या. त्यानंतर सांत्वनासाठी म० गांधी मुंबईला आले असता भेटून गेले होते. पुढे दीड-दोन वर्षांतच काकासाहेबांना ७५ वर्षे (१९४७) पूर्ण होणार होती. 'नवा काळ 'चा रौप्यमहोत्सव (२५ वर्षे) होता. हे दोन्ही कार्यक्रम उत्साहाने आणि उत्सवाने करण्याचा हितचिंतकांचा इरादा होता; पण दैवाला हेही मंजूर नव्हते. १९४७ फेब्रुवारीमध्ये काकासाहेबांचा अत्यंत लाडका नातू नरहरी याचा विषमज्वराने अकाली मृत्यू झाला आणि काकासाहेबांच्या प्रापंचिक जीवनातील दुःखांचा कडेलोट झाला. प्रकृती अधिकाधिक खालावत गेली. अशा दुःखातही एक सुखद घटना घडली. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. 'आज माझी माता स्वतंत्र झाली. माझा देश स्वतंत्र झाला, ' असे उद्गार त्यांनी काढले. तेव्हा ते मुंबईला होते. स्वातंत्र्यसोहळ्यात मुंबई विद्युत रोषणाईने ११६ ( नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर