Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एका राजकारणी, लेखक असलेल्या गृहस्थाची पत्नी म्हणून घरातली वर्दळ, पै- पाहुण्यांचा राबता या सर्व बाबी त्यांनी दक्षतेने आणि आत्मीयतेने सांभाळल्या. म० गांधी यांच्या विचार-प्रभावाचा प्रसार वृत्तपत्राद्वारे काकासाहेब करीत होते. त्याच काळात पतीकार्याशी तद्रूप होऊन खादीचा प्रचारही त्यांनी केला. अशा गौरकाकूंच्या दुखण्याला एक किरकोळ निमित्त झाले. त्यांच्या पायाला 'टाचरू' झाले. बरेच दिवस घरगुती उपाय केले, तरी दुखणे बरे होईना. तेव्हा वैद्यकीय उपचार सुरू केले, तेव्हा दुखणे विकोपाला गेले होते. त्यांना मधुमेहाचा विकार असल्याचेही तेव्हाच समजले. सामान्यपणे स्त्रिया स्वतःच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात, तसेच येथेही झाले. अखेर संपूर्ण पाऊल... घोट्यापासून कापून काढावे लागले आणि एक कर्तव्यदक्ष गृहिणी अपंग झाली. या काळात काकासाहेब सांगलीला होते. सांगलीला १९३३ मध्ये त्यांनी दत्तमंदिर बांधले होते आणि एक घरकुल बांधले होते. वृत्तपत्रीय जबाबदारीतून निवृत्त झाल्यावर काकासाहेब दरवर्षी सांगलीला या दत्तमंदिरात प्रवचने करीत असत. अन्यत्रही प्रवचने करीत. अशात गौरकाकूंच्या दुखण्याची वार्ता देणारी तार आली आणि काकासाहेब मुंबईला गेले. काकूंचा पाय कापण्यासाठी काकासाहेबांची अनुमती आवश्यक होती: उभयतांच्या उत्तर आयुष्यातली ही घटना क्लेशदायक ठरली. एकूणच कौटुंबिकदृष्ट्या काकासाहेबांचे अखेरचे पर्व संकटांची मालिका झेलण्यात गेले. अशा वेळी मन आणि बुद्धी समधात ठेवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत होते. तत्त्वज्ञान हा त्यांचा केवळ अभ्यासविषय राहिला नव्हता, तर जगण्याचा अविभाज्य भाग झाला होता. प्रवचनांद्वारा एक प्रकारे ते मुक्त चिंतन करीत असत. 'मी नाटककार झालो नसतो, तर कीर्तनकार झालो असतो,' असे त्यांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. आता ते प्रवचनकार झाले होते. या प्रवचनांसाठी त्यांनी वैदिक तत्त्वज्ञान आणि उपनिषदांचा आधार घेतला होता. त्यातील काही भाग पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या मते, वैदिक तत्त्वज्ञान हे समाजधारणेसाठी मोलाचे आहे. एका अर्थी वृत्तपत्रकार आणि नाटककार म्हणून ऐन उमेदीत त्यांनी जन- जागरणाचे आणि लोकशिक्षणाचे कार्य केले होते, तेच अखेरच्या पर्वात प्रवचनकार म्हणून सिद्धीस नेले. • १९३८ मध्ये दरवर्षीप्रमाणे प्रवचनांसाठी काकासाहेब सांगलीला गेले होते. त्याआधी नृसिंहवाडीच्या दत्तमंदिरात त्यांचे प्रवचन झाले होते. आता सांगलीला ते आले होते. दत्तमंदिरात नित्याप्रमाणे फेऱ्या मारीत असता ते अचानक कोसळून पडले. त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्याचा वाचाशक्तीवर परिणाम झाला. समारोप ११५