Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संहिताकर्त्याने पदरचना केली म्हणून काही बिघडत नाही. या पार्श्वभूमीवर खाडिलकरांच्या 'मानापमान'मधील पदांचा विचार केला तर काय दिसते ? या नाटकातील अनेक पदे आजही नाट्यसंगीत म्हणून रसिकप्रिय आहेत, ती त्यांच्या चालींमुळे. ‘भामिनीची पदे मृदुमधुर आणि लडिवाळ आहेत. त्यामुळे ती खालच्या पट्टीत गायिली गेली (एरव्ही बालगंधर्व सामान्यतः काळी दोन या पट्टीत गात असत). उलट धैर्यधराची पदे त्यांच्या रागांच्या स्वरूपामुळे चढ्या पट्टीत गायिली गेल्यामुळे स्वाभाविकच त्यांनी श्रोत्यांची पकड घेतली. ' (म० अं० सु०, वाळिंबे, पृ० ६४) 'मानापमाना'चे यश त्यातील पदांच्या गायकीत आहे, हे सर्वच टीकाकारांचे मत आहे. खाडिलकर गद्य नाटककार म्हणूनच स्थिर झाले होते. ते 'कवी'- काव्यरचनाकर्ते नव्हते. (संस्कृत साहित्यशास्त्रानुसार सर्वच साहित्यिकांना ( गद्य- पद्य) 'कवी' ही संज्ञा आहे, हा भाग वेगळा!) खाडिलकरांच्या 'मानापमान' नाटकाच्या कथावस्तूसंबंधी यापूर्वी सांगितले आहेच. वा० ल० कुलकर्णी यांच्या मते, 'मानापमान' हा 'मेलोड्रामा' आहे, तर ना० सी० फडके यांच्या मते, ती 'परिकथा' आहे. म्हणून त्या कथावस्तूतील ढोबळपणा, चमत्कृती, अतार्किकता यांच्याकडे दुर्लक्ष करावे. डॉ० रा० शं० वाळिंबे अधिक परखड भाषेत टीका करतात. ती त्यांच्याच शब्दात पाहणे योग्य होईल. १९८० च्या सुमारास 'संगीत रंगभूमीचे सुवर्णयुग'मध्ये पृ० ४० वर ते म्हणतात, 'मानापमान'चा पहिला प्रयोग होऊन आज सत्तर वर्षे झाली आहेत (प्रस्तुत २०१० मध्ये हे लेखन करताना १०० वर्षे झाली आहेत - लेखिका); तथापि त्यातील ५४ पदांपैकी निदान २५ पदे आजही अतिशय लोकप्रिय आहेत. हे पदांच्या गायकीच्या यशाचे गमक आहेत. 'गायकीच्या यशाचे गमक' हे शब्द मी मुद्दाम वापरले आहेत. या अभूतपूर्व यशाचा खाडिलकरांनी खूप ठाकठोक करून व मारून मुटकून बनवलेल्या पदांमधील शब्दांशी अथवा त्यांच्या अर्थाशी कसलाही संबंध नाही. त्यातील शब्दांकडे आणि अर्थाकडे पूर्ण दुर्लक्ष करूनच रसिकांनी ही पदे ऐकली आणि केवळ संगीताचा स्वर्गीय आनंद लुटला. खाडिलकरांच्या बहुतेक सर्व पदांमध्ये शब्दसौंदर्य, अर्थगौरव, कल्पनावैचित्र्य, भावनाविष्कार, सुबक शैली, कल्पनाचित्र इत्यादी सर्वमान्य काव्यगुणांचा केविल- वाणा खडखडाट आहे. 'मानापमान' मधील पदे केवळ अलौकिक संगीताच्या सामर्थ्यावरच उभी आहेत. ' या अखेरच्या ठाम विधानाने वाळिंबे यांनी टीकाकारांचे प्रतिनिधित्वच केले आहे. ११० । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर