Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

किर्लोस्करी संगीत नाटकातील पदरचना आणि संगीत विषयक पायंडा खाडिलकरांनी मोडला. तत्पूर्वीचे नाटककार नाट्यकथानकाच्या ओघाला साजेशी, कथानकाचा एक भाग असावीत अशी आणि म्हणूनच प्रासादिक पदे रचीत. त्यात पारंपरिक प्रेक्षकाला परिचित... कीर्तनाख्यानासारखी आर्या, दिंड्या, साकी अशी किंवा क्वचित भजने आणि शृंगारिक धर्तीच्या लावण्यांच्या चाली असत. रागदारी, शास्त्रीय संगीताचा पाया तर नाट्यसंगीताला असावा लागतो; तसा तो तेव्हाही असे. खाडिलकरांनी या प्रथेत काही बदल केले. साक्या, दिंड्यायुक्त पदे कमी करून श्री० कृ० कोल्हटकरांपासून आलेल्या पारशी उर्दू शैलीतील जोरकस चालींचा (विशेषतः धैर्यधराच्या पदात) वापर केला. महत्त्वाची गोष्ट शास्त्रीय संगीतज्ञ गोविंदराव टेंबे यांनी प्रथम पदांच्या चाली नोटेशनसह दिल्या आणि त्यावर आधारित पदांची (शह) रचना खाडिलकरांनी केली. या नावीन्याचे काहीजणांनी कौतुक केले; पण प्रतिकूल टीकाकारांची संख्या अधिक होती. 'खाडिलकरांची पदे रचण्याची पद्धत तऱ्हेवाईक होती. अगोदर चाली घ्यायच्या आणि मग त्याला अनुसरून पदे रचायची, अशी रीत होती. चालींच्या अक्षरांखाली मात्रांच्या खुणा करून घ्याव्या लागत,' असे डॉ० रा० शं० वाळिंबे यांनी 'संगीत रंगभूमीचे सुवर्णयुग' ( पृ० ४५) मध्ये तिरकसपणे म्हटले आहे. नाटकाच्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या (१९११) प्रस्तावनेत 'नाटकातच प्रत्येक पदाचे खाली स्वरमाला' देण्यात आली आहे... रा० रा० गोविंद सदाशिव टेंबे यांनीच या नाटकातील पदांच्या चाली दिल्या असून पदांची स्वरमालाही त्यांनीच तयार केली आहे,' असा खाडिलकरांनीच उल्लेख केला आहे; मात्र १९९४ च्या दुसऱ्या आवृत्तीत ' पदांच्या नोटेशनचे स्वतंत्र पुस्तक काढणे अधिक सोयीचे वाटल्यावरून या आवृत्तीत पदांच्या खाली स्वरमाला देण्यात आलेली नाही.' अशी दुरुस्ती केली आहे. एका अर्थाने तोपर्यंत लेखकच आपल्या कुवतीनुसार चालींवर पदरचना करी. तो पायंडा मोडून आजच्या भाषेत 'संगीत दिग्दर्शक' हा एक स्वतंत्र घटक रंगभूमीवर आला; तसेच आज विशेषतः चित्रपटांच्या गाण्यांच्या चाली आधी बांधून त्यावर गीते रचली जातात, त्याचा प्रारंभ 'मानापमान'ची गीते आणि चाली यांपासून प्रतिष्ठित झाला, असे म्हणता येईल. असे असले तरी आजच्या अनेक गीतकारांनी अशी रचलेली गीते काव्य म्हणून सुद्धा खूप सरस असल्याचा अनुभव आहे. शांताबाई शेळके आणि ग. दि. माडगूळकर ही मराठीतली ठळक उदाहरणे आहेत. हे अशासाठी सांगितले की, आधी संगीत दिग्दर्शकाने चाली देऊन नंतर नाटककार खाडिलकर / १०९