Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मतप्रवाह शोधण्याची एक पद्धतच पडून गेल्याचा परिणाम म्हणून तर 'स्वयंवरा'- बद्दलही अशी मते झाली नसावीत ना ? संगीत द्रौपदी : १९२० खाडिलकरांच्या १९२० पर्यंतच्या पौराणिक नाटकातील हे शेवटचे नाटक. यानंतरच्या नाटकातून खाडिलकरांचे म्हणून काही वेगळेपण व्यक्त होण्याचे शिल्लक राहत नाही. खाडिलकरांचे एक बऱ्यापैकी नाटक म्हणजे 'द्रौपदी ! ' 'द्रौपदी' पासूनच खाडिलकरांच्या नाट्यप्रतिभेला ओहोटी लागलेली दिसते. ' मयसभेतील दुर्योधनाच्या मत्सरापासून प्रारंभ करून वनवासाला पांडव आणि द्रौपदी जाईपर्यंतचा महाभारताचा कथाभाग या नाटकात घेतला आहे, असे पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत (१९२०) खाडिलकर लिहितात. एकूण तीन अंकात आटोपलेले हे सुटसुटीत आणि बांधेसूद रचनेचे नाटक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. खाडिलकरांची सर्वच नाटके तशी रचनेच्या दृष्टीने बांधेसूद असतात. केवळ पौराणिक कथा सांगणे, हे खाडिलकरांच्या नाट्यलेखनाचे उद्दिष्ट कधीच नसते; तर पौराणिक नाटकाच्या निमित्ताने जीवनातील काही शाश्वत संघर्ष, शाश्वत वृत्ती-प्रवृत्ती वा व्यक्तिरेखा उभ्या करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हा प्रयत्न नेहमीच यशस्वी होतो, असे नाही; पण प्रयत्न असतो, हे खरे. 'सं० द्रौपदी'मध्ये अर्थातच द्रौपदी ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. पांडवांनी राजसूय यज्ञाच्या निमित्ताने मयसभा बांधली. मयसभेत दुर्योधनाला खऱ्या जलाशयाच्या जागी चित्राचा भास झाला. पाय घसरून अनवधानाने तो जलाशयात पडला, तेव्हा सम्राज्ञी द्रौपदी त्याला उपहासाने हसली. त्याचे उट्टे काढण्यासाठी शकुनीच्या मध्यस्थीने द्यूताचा डाव दुर्योधनाने टाकला. धर्मराज सर्व पांडवांसह सर्वस्व हरला. अखेर त्याने द्रौपदीला पणाला लावले. ती जिंकली गेली. त्यामुळे भर दरबारात झालेली तिची विटंबना ही या नाटकातील मध्यवर्ती घटना होय. कौरवांच्या मनात धुमसत असलेला क्रोध भर दरबारात द्रौपदीची अवहेलना आणि अपमान करूनच पूर्ण होणार होता. त्याप्रमाणे त्यांच्या मते, कौरवांची दासी झालेल्या, एकवस्त्रा द्रौपदीला भर सभेत आणून विवस्त्र करून तिची विटंबना कौरव करू लागले. अशा वेळी अतिशय मानी, तेजस्वी आणि स्वातंत्र्याची आग्रही भूमिका मांडणारी द्रौपदी ठामपणे विरोधाला उभी राहिली आहे. 'मी स्वतंत्र आहे. मी दासी नाही,' ही तिची आग्रही भूमिका आहे. 'जे पांडव आधी द्यूतात जिंकले गेले आणि दास झाले, त्यांना नंतर मला पणाला लावण्याचा अधिकारच कसा पोहचतो ?' असा तिचा युक्तिवाद आहे. सभेतील भीष्म, द्रोण, १०४ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर