हेच होते; परंतु शेवटी जसजसा हरिश्चंद्र एकेका सत्त्वपरीक्षेतून उत्तीर्ण होत पुढे जात राहतो, तेव्हा विश्वामित्र अधिकच उघडा पडत जातो. या नाटकात विश्वामित्र हा प्रतिनायक ! तो आक्रस्ताळा ठरल्याने हरिश्चंद्रही फारसा सबळ ठरत नाही. विश्वामित्राला शेवटी शेवटी एक स्पृहणीय व्यक्तिमत्त्व प्राप्त होते आणि तोवर नाटक संपते. गौण पात्रांचाच पसारा येथे फार आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवहाराने आणि संवादाने अर्धा अधिक भाग व्यापला आहे आणि हे खाडिलकरांबाबत जवळ जवळ नेहमीच होते. हा सगळा अनुपयुक्त फापटपसारा वाटतो. नाटकाचा एकसंघ परिणाम उणावतो. नाटकातील संवाद हे सार्थक आणि अपरिहार्य असावेत. बाकीचा फापटपसारा हा नाट्याला घातक वा मारक ठरतो. शिवाय ही पात्रे मुख्य पात्रांशी संबंधित असतात. प्रतिपक्षाची ती साहाय्यक असतात. येथे सुवर्णदासी, चित्रगुप्तादी पात्रे विश्वामित्राचे साहाय्यक आहेत. अशा क्षुद्र बुद्धीच्या, स्वार्थी आणि मूर्ख व्यक्तींच्या प्रभावळीत राहणारा विश्वामित्रही आपले वैशिष्ट्य गमावून बसतो. समर्थ प्रतिपक्षावर विजय मिळवूनच नायकाचे सामर्थ्य व्यक्त होते. येथे या गौण पात्रांच्या पसाऱ्यात प्रतिपक्षच दुबळा होतो. परिणामतः नायकही निष्प्रभ ठरतो. हरिश्चंद्र शेवटी विश्वामित्राच्या सत्त्वपरीक्षेला उतरतो, हे पौराणिक कथेतील सत्य या नाटकाच्या अखेरीसही दाखविले आहे. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदासाची सत्वस्थ व्यक्तिमत्त्वे त्यांच्या उत्तुंग तत्त्वनिष्ठेने आणि पराकोटीच्या सत्यव्रतीपणाने असामान्य उंचीवर पोहचण्याची लेखकाचीही अपेक्षा होती. ती सफल होत नाही. त्यामुळे या नाटकाची कथा हरिश्चंद्राचे सत्त्वधीरत्व विरोधी विश्वामित्राचा हेकेखोर आणि अहंकारी विरोधही सार्थ ठरत नाहीत आणि हरिदासांच्या पुराणकथेच्याच पातळीवर ही 'सत्त्वपरीक्षा' राहते. हरिश्चंद्रादींवर संकटावर संकटे इतकी आणली आहेत की, वाजवीपेक्षा ताणल्याने त्याविषयी सहानुभूती आणि अनुकंपा वाटणे संपून जाते. त्याचा छळ करणारी माणसेही इतकी ठोकळेबाज, स्वार्थी आहेत की, त्यांचा छळही प्रत्ययकारी वाटत नाही आणि त्यांच्या दुष्टपणाबद्दल क्रोधही येत नाही. इतकी तद्दन खोटी आणि कृत्रिम पात्रसृष्टी निर्माण करून या नाटकातील मुख्य सत्वदर्शनाचे तत्त्वच नख लावून मारले आहे. खाडिलकर जीवनातील जो एक शाश्वत तात्त्विक संघर्ष दाखवू इच्छितात, तो पूर्णपणे सपाट होतो आणि ही देवळातील पारंपरिक पुराणकथा होते. अखेरीस शंकर-पार्वती प्रसन्न होणे वगैरे भाग तर हरिश्चंद्राचे उरलेसुरले 'व्यक्तित्व' ही संपवून टाकतो. १०० । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/१०३
Appearance